जेजुरी वारीत भीषण अपघात; भरधाव टेम्पो दिंडीत घुसल्याने तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
पुणे प्रतिनिधी :
आषाढी वारीदरम्यान सोमवारी सकाळी जेजुरीजवळील सासवड-जेजुरी मार्गावर भीषण अपघात झाला. भरधाव टेम्पोने वारकऱ्यांच्या दिंडीत घुसल्याने तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर 15 ते 16 वारकरी जखमी झाले. त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडहून जेजुरीकडे मार्गस्थ असताना ही दुर्घटना घडली. जेजुरीत पालखी आगमनाच्या पार्श्वभूमीवर वारकरी मोठ्या संख्येने मार्गक्रमण करत असताना टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते थेट दिंडीत घुसले. धडकेनंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.
जखमी वारकऱ्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृत महिलांपैकी काही सांगली जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
टेम्पो अनियंत्रित होण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.
