Saturday, August 29, 2026
Latest NewsPUNE

पुणे जिल्हा परिषदेच्‍या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीनंतर आता सभापतीपदासाठी मोर्चेबांधणी; मिलिंद वाळंज यांचे नाव आघाडीवर

 

-संतोष राऊत, तुषार थोरात,अमोल नलावडे यांच्या नावांची चर्चा

पुणे: पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष विषय समिती सभापतींच्या निवडीकडे लागले आहे. अध्यक्षपदी वीरधवळ जगदाळे (दौंड) आणि उपाध्यक्षपदी विवेक वळसे-पाटील (आंबेगाव) यांची वर्णी लागल्याने, आता प्रादेशिक समतोल साधण्यासाठी मुळशी , मावळ तालुक्याला झुकते माप मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये पौड गटाचे तरुण सदस्य आर्किटेक्ट मिलिंद वाळंज यांचे नाव अग्रक्रमाने चर्चेत आहे.

जिल्हा परिषदेत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व असून, बांधकाम, समाजकल्याण, महिला व बालकल्याण आणि कृषी व पशुसंवर्धन या चार समित्यांच्या सभापतीपदासाठी इच्छुकांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

सर्व समित्या ग्रामीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या मानल्या जातात . अध्यक्ष उपाध्यक्ष पद अनुभवी नेतृत्वाखाली दिल्याने खालील समित्यांसाठी युवा उमेदवारांची वर्णी लागण्याची शक्यता आहे . मिलिंद वाळंज , संतोष राऊत , तुषार थोरात , अमोल नलावडे यासारख्या युवा चेहऱ्यांना संधीची शक्यता असून त्यामध्ये मिलिंद वाळंज हे स्वतः आर्किटेक्चर पदवीधारक असून त्यांना उद्योग आणि सामाजिक क्षेत्राचा दांडगा अनुभव आहे. वारकरी संप्रदायाचा वारसा आणि उच्चशिक्षित युवा चेहरा ही त्यांची जमेची बाजू मानली जात आहे. त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील रस्ते आणि इमारतींच्या प्रलंबित कामांना तांत्रिक गती मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. आता पक्षश्रेष्ठी कोणाच्या गळ्यात सभापतीपदाची माळ घालतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी पक्षाने नेहमीच राजकारणात तरुणांना प्राधान्य देण्याची आणि कर्तबगार चेहऱ्यांना संधी देण्याची भूमिका घेतली आहे. याच धोरणाचा भाग म्हणून पुणे जिल्हा परिषदेच्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बांधकाम सभापतीपदी पौड गटातील तरुण आणि धडाडीचे नेते मिलिंद वाळंज यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. मिलिंद वाळंज हे केवळ राजकीय नेते नसून ते आर्किटेक्चर पदवीधर आहेत. व्यवसायाने वास्तुरचनाकार असल्याने त्यांना बांधकामातील तांत्रिक बाबी, नकाशे आणि नियोजनाचा दांडगा अनुभव आहे.

तरुणांना संधी दिल्यास पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची एक मोठी फळी उभी राहू शकते, हे वाळंज यांच्या माध्यमातून यशस्‍वी होण्याची चिन्‍हे आहेत. सुशिक्षित आणि कामाची जाण असलेला तरुण चेहरा समोर आल्यास तरुणांचा ओढा पक्षाकडे अधिक वाढण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील रस्ते, इमारती आणि इतर विकासकामांना गती देण्यासाठी मिलिंद वाळंज यांच्यासारख्या अभ्यासू नेतृत्वाला संधी मिळावी, अशी मागणी आता कार्यकर्त्यांकडून जोर धरू लागली आहे. येणाऱ्या काळात जिल्हा परिषदेच्या निवडीत त्यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading