Monday, May 25, 2026
ENTERTAINMENTLatest News

भारती आचरेकर दिसणार मराठी मालिकेत पहिल्यांदाच !

 

असं म्हणतात रक्ताच्या नात्यापेक्षा जोडली गेलेली नाती कधी कधी अत्यंत प्रिय असतात. ती आपल्यासाठी कुठलंही वादळ झेलून नेतात, आपल्यामागे खंबीरपणे उभी असतात आणि वेळ पडल्यास जीव ओवाळून टाकायला देखील मागं पुढे पाहत नाहीत. याच धाग्यावर आधारित नवी मालिका ‘मी जिंकून घेईन सारं’. या नव्या मालिकेतील छवी देखील अशीच आहे. रक्ताचं नातं नसलं तरीदेखील छवीसाठी बाई- आजी म्हणजे देवासमान आहेत… त्यांच्यासाठी आणि राजगुरू परिवारासाठी छवी काहीही करू शकते. पण, या कुटुंबाचे रक्षण करताना तिच्यासमोर अनेक अडथळे येणार आहेत, त्यांना ती कशी सामोरी जाणार ? कशी ते हे सगळ निभावून नेणार? हे जाणून घेण्यासाठी नक्की पहा ‘मी जिंकून घेईन सारं’. नुकताच या मालिकेचा प्रभावी प्रोमो आला असून, त्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. या प्रोमोमधील सर्वात मोठं आकर्षण ठरते ते ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर. त्या ‘बाई-आजी’ या अत्यंत वेगळ्या, ठाम आणि प्रभावी भूमिकेत प्रथमच मराठी मालिकेत दिसणार आहेत. कमी संवादांतूनच त्यांची स्क्रीन प्रेझेन्स, लाघवी व्यक्तिमत्त्व आणि करारी बाणा ठसठशीतपणे जाणवतो. अत्यंत गोड, सोज्वळ आणि प्रत्येकाचं मन जिंकून घेणारी छवीची भूमिका जान्हवी तांबट साकारणार आहे. शांभवीची भूमिका अमृता फडके, वत्सला- वंदना वाकनीस, अनिकेत – संचीत चौधरी, साकेत – अमित रेखी आणि बेबी आत्या – दिशा दानडे हे देखील महत्वपूर्ण भूमिकेत असणार आहेत. पहा येऊदे कितीही अडचणीचं वारं… मी जिंकून घेईन सारं १६ मार्चपासून संध्या. ७वा. आपल्या कलर्स मराठीवर.

राजगुरु परिवाचा डोलारा बाई – आजी सांभाळत आहेत. त्या कुटुंबाच्या कर्ताधर्ता आहेत. जसं जिजाऊ शिवाजी महाराजांच्या मागे खंबीरपणे उभ्या होत्या, तसंच बाईजी आपल्या मुलाच्या पाठीशी उभ्या राहिल्या. एका अपघातात मुलगा आणि सून अकाली गेले. तेव्हापासून बाई – आजींनी साकेत आणि अनिकेत या आपल्या नातवंडांना आईची माया दिली. आणि याच राजगुरू परिवारात लहानाची मोठी झाली आपली छवी. सुंदर, सुशील या पारंपरिक चौकटीत न बसणारी ही imperfect छवी…स्वभावाने बडबडी, थोडीशी अति उत्साही; पण तितकीच हुशार. प्रत्येक नात्यात मनापासून जीव ओतणारी. बाई – आजींचा रुबाब, छवीची त्यांच्यावर असलेली निष्ठा क्षणोक्षणी प्रकर्षाने दिसून येते. एकीकडे बाई – आजी आणि छवीचं सावलीसारखं नातं. पण, या परिवारावर वाकडी नजर आहे ती म्हणजे अत्यंत चाणाक्ष, धूर्त, अप्पलपोटी आणि उलट्या काळजाची मुलगी शांभवी हिची. हिच्या मनात साचलेला भूतकाळ आणि सूडाची भावना हे राजगुरू परिवारावर नक्कीच कुठलं तरी संकट घेऊन येणार. राजगुरू परिवारात येऊन त्यांना उध्द्व्स्त करण्याचा शांभवीचा डाव छवीला समजेल ? कितीही संकटं आली तरी छवी ती खंबीरपणे कशी निभावून नेणार ? शांभवीच्या सूडामागचं नेमकं कारण काय आहे ? छवी राजगुरू कुटुंबाचं रक्षण करताना कोणती किंमत मोजणार? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.

बाई-आजी ठामपणे तिच्या पाठीशी उभी राहताना दिसणार आहे. प्रोमोमध्ये बाई-आजी आणि छवीमधील अतूट विश्वासाचं नातं ठळकपणे दिसून येतं. आयुष्याच्या निर्णायक क्षणी बाई-आजी प्रत्येक निर्णयासाठी छवीच्या ठाम व्यक्तिमत्त्वावर आणि विचारांवर विसंबून असल्याचं जाणवतं. छवीवर असलेला बाई-आजींचा अढळ विश्वास आणि तिच्याकडून मिळणारा आधार हा या नात्याचा गाभा आहे. ज्यांच्यावर प्रेक्षक मनापासून प्रेम करतात अश्या आपल्या लाडक्या भारती आचरेकर या मालिकेविषयी बोलताना म्हणाल्या, ‘बाई-आजी’ ही केवळ परंपरागत चौकटीतली आजी नाही, तर उदारमतवादी, मोकळ्या विचारांची आजी आहे. काळानुसार बदल स्वीकारणारी, आजच्या पिढीच्या विचारांशी सहज जुळवून घेणारी आणि स्निकर घालून आत्मविश्वासाने वावरणारी ही ‘कूल’ आजी कायम हसतमुख व आनंदी असते. नातवंडांना समजून घेणारी, त्यांच्याशी मैत्रीपूर्ण नातं जपणारी अशी ती स्त्री आहे. तरीही घराचा कणा असलेली, संकटांनी तावूनसुलाखून निघालेली पण कधीही न ढासळणारी ही बाई-आजी’ नातवंडांसाठी खंबीरपणे उभी आहे. नातवंडांना स्वप्न पाहू देतात, पण शिस्त आणि जबाबदारीची जाणीवही करून देतात. प्रामाणिकपणा आणि कष्ट यांना त्या सर्वाधिक महत्त्व देतात, म्हणूनच मेहनती छवीवर त्यांचा खास जीव आहे. अनुभवसंपन्न असूनही भावना कधी कधी त्यांच्या निर्णयांवर मात करतात, आणि त्यामुळेच ही व्यक्तिरेखा अधिक जिवंत व मानवी वाटते. सर्वात खास म्हणजे, इतक्या वर्षांच्या कारकिर्दीनंतर मी पहिल्यांदाच मराठी मालिकेत इतक्या मध्यवर्ती भूमिकेत काम करते आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा एक नवा आणि उत्सुकतेचा टप्पा आहे. ‘बाई-आजी’सारखं बहुपेडी, ताकदीचं आणि भावनिक छटा असलेलं पात्र मला साकारायला मिळणं ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे.”

मालिकेविषयी बोलताना Executive Vice President, Marathi Cluster, सतीश राजवाडे म्हणाले, “आमचा प्रयत्न नेहमीच दर्जेदार आणि वेगवेगळ्या धाटणीची कथानकं प्रेक्षकांसमोर आणण्याचा असतो. बऱ्याच काळानंतर आम्ही एक फिक्शन मालिका घेऊन येत आहोत, जी संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून पाहावी अशी आहे आणि सर्व वयोगटातील प्रेक्षकांना भावेल अशी आहे. ‘मी जिंकून घेईन सारं’ ही जिद्द, नात्यांची गुंतागुंत आणि मूल्यांची परंपरा यांचा संगम असलेली कथा आहे. ही छवीची गोष्ट आहे जिने लहानपणापासून अनेक संकटांना सामोरं जात आयुष्य घडवलं, पण आपल्या माणसांसाठी प्रत्येक लढाई जिंकण्यावर तिचा ठाम विश्वास आहे.पुढे ते म्हणाले, छवीच्या आयुष्यात बाई-आजींची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्या तिचं आधारस्थान आणि तिचा खरा सपोर्ट सिस्टीम आहेत. बाई-आजींचं निखळ प्रेम आणि विश्वास यामुळेच छवी खंबीरपणे उभी आहे आणि घराला सांभाळून ठेवण्याचा मनापासून प्रयत्न करत आहे. या मालिकेद्वारे भारती आचरेकर पहिल्यांदाच टेलिव्हिजनवर दिसणार आहेत आणि ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांचा समृद्ध आणि प्रदीर्घ अनुभव या मालिकेचं सर्वात मोठं बळ आहे. प्रेक्षकांना एक दर्जेदार आणि अर्थपूर्ण अनुभव देण्यात आम्ही नक्कीच यशस्वी ठरू, असा आम्हाला विश्वास आहे.”

या संघर्षात महत्त्वाची भूमिका बजावणारी बबी आत्या देखील टीझरमध्ये दिसते. आत्याची उपस्थिती कथेला आणखी धार देणार. नात्यांमधील ताणतणाव, घरातला संघर्ष आणि एका ठाम स्त्रीचा खंबीर आवाज या सगळ्याची झलक देणारा ‘मी जिंकून घेईन सारं’ चा हा प्रोमो प्रेक्षकांना अनेक प्रश्नांसह सोडून जातो. “येऊदे कितीही अडचणीचं वारं… मी जिंकून घेईन सारं…पहा १६ मार्चपासून संध्या. ७ वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading