राष्ट्रवादी काँग्रेस हा सामूहिक नेतृत्वावर चालणारा पक्ष
हीच परंपरा कायम ठेवण्याची तटकरे यांची ग्वाही
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस हा सामूहिक नेतृत्वावर चालणारा पक्ष आहे. पक्षप्रमुख अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर हीच परंपरा कायम राखली जाईल, अशी ग्वाही देतानाच पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भूमिका महत्त्वाची असेल, हे देखील प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.
सध्याच्या काळात अजित पवार यांच्या अंतिम इच्छा च चर्चा सर्वत्र केली जात आहे. प्रत्यक्षात 2019 मध्येच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरकार स्थापन करण्याची अजित पवार यांची भूमिका होती. मात्र, त्यावेळी ती स्वीकारण्यात आली नाही. त्यामुळेच आम्हा सर्वांना आपल्या पक्षाविषयी वेगळा निर्णय घेणे भाग पडले. ती भूमिका देखील केवळ एकट्या अजित पवार यांची नव्हे तर तो सर्वांनी एकत्र येऊन घेतलेला निर्णय होता, असा दावा तटकरे यांनी केला.
पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची मोठी चर्चा झाली. प्रत्यक्षात राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या स्पर्धेत आपण नसल्याचे पटेल यांनी दिल्ली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. उपमुख्यमंत्री पद तातडीने भरणे गरजेचे असल्यामुळे त्याबाबत त्वरेने निर्णय घेतला गेला. योग्य वेळ आल्यावर कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष पदाबाबतही निर्णय घेतला जाईल, असे तटकरे यांनी सांगितले.
