भारताने कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये मोठी गुंतवणूक करण्याची गरज – डॉ. आनंद देशपांडे
पुणे : सध्या जगभरात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयची लाट असून त्यामध्ये काम करण्याच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत, त्यामुळे आगामी काळात भारताने यामध्ये मोठी गुंतवणूक करण्याची आवश्यकता असल्याचे मत पर्सिस्टन्ट सिस्टिम्सचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. आनंद देशपांडे यांनी व्यक्त केले.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात डॉ. देशपांडे यांनी दिलेल्या भरीव योगदानाबद्दल सॉफ्टवेअर एक्सपोर्टर असोसिएशन ऑफ पुणे अर्थात सीप या संस्थेच्या वतीने भारतीय संगणक शास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ पद्मश्री प्रा. डी. बी. पाठक यांच्या हस्ते डॉ. देशपांडे यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला, त्यावेळी डॉ. देशपांडे बोलत होते.
पर्सिस्टन्ट सिस्टिम्सचे संस्थापक दादा देशपांडे, सॉफ्टवेअर एक्सपोर्टर असोसिएशन ऑफ पुणेचे अध्यक्ष शिवराज साबळे, उपाध्यक्ष शिवेश विश्वनाथन, सचिव विद्याधर पुरंदरे, खजिनदार आनंद रानडे यांसोबतच सीपच्या माजी अध्यक्षा विनीता गेरा, अभिजित अत्रे, नितीन देशपांडे व आशुतोष पारसनीस आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. कोरेगाव पार्क येथील हॉटेल वेस्टीन येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमादरम्यान माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या विविध व्यक्ती व संस्थांचा सीप स्टार अवॉर्डने गौरवही करण्यात आला.
यामध्ये ऑपरेशनल एक्सलन्स विभागात ‘ऑलव्ह्यू सिस्टम्स’, मेकिंग अ डिफरन्स इन पीपल प्रॅक्टिसेस विभागात ‘झोरिएंट’ व ‘आयसरटीज’, बेस्ट इएसजी प्रॅक्टिसेस विभागात ‘ओपस’, बेस्ट टेक्नोलॉजी अँड इनोव्हेशन प्रॅक्टिसेस विभागात ‘इव्होलंट’ या संस्थांना तर एक्सम्प्लरी वूमेन लीडर विभागात बेला खेर व दीप्ती देवरकोंडा यांना तर टेक रोल मोडेल विभागात भूषण सालेर व अभिजित झीलपेलवार यांचा सन्मान सीपच्या वतीने करण्यात आला.
गेल्या २५ वर्षांमध्ये माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक बदल होत गेले. दिवसेंदिवस त्यामध्ये चांगली प्रगती होत आहे. भारताने देखील त्यामध्ये केलेली प्रगती वाखाणण्याजोगी असल्याचे मत डॉ. देशपांडे यांनी मांडले. मोबाईल, ई-मेल यांच्यामध्ये झालेले बदल सांगताना त्यांनी सॉफ्टवेअरने केलेली प्रगती विशद केली. आयटीमध्ये आलेली पहिली लाट ही कनेक्टिव्हिटीची, दुसरी लाट व्यासपीठ आणि विविध प्रणाली यांची होती. सध्या आलेली लाट ही कृत्रिम बुद्धिमत्तेची असल्याचे सांगताना कृत्रिम बुद्धिमत्तेचे व्यासपीठ मोठे असून त्यामध्ये काम करण्यासाठी नव्या प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत व कामाची कोणतीही कमतरता नाही असे डॉ. देशपांडे म्हणाले.
“भारतामध्ये आयटी क्षेत्रात उत्तम प्रगती होत आहे. देशाने भविष्यकाळाचा विचार करून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात अधिक गुंतवणूक केली तर त्याचा देशाच्या प्रगतीला निश्चितपणे चांगला फायदा होऊ शकतो. सध्या असणारी एआयची लाट दीर्घकाळ राहणार आहे, त्यामुळे इथे काम करण्याच्या अनेक नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. उद्योगांना या तंत्राचा चांगला फायदा होऊ शकतो. त्यामुळे आपण या नव्या संधीचा फायदा घेण्याची आवश्यकता आहे, असे डॉ. देशपांडे म्हणाले. आपल्याला पहिल्यांदाच जीवनगौरव पुरस्कार मिळत असून तो सीप सारख्या कुटुंबाकडून मिळत असल्याने पुरस्काराबद्दल अधिक कृतज्ञता आहे, असे सांगत डॉ. देशपांडे यांनी आनंद व्यक्त केला. डॉ. आनंद देशपांडे यांनी आयटी क्षेत्रात केलेल्या कामामुळे पुण्याच्या लौकीकामध्ये भर पडली असल्याचे पद्मश्री प्रा. डी. बी. पाठक यावेळी म्हणाले. चैतन्य राठी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
