25 महापालिकांवर भाजपने वर्चस्व मिळवले ही उल्लेखनीय कामगिरी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्यातील 29 महापालिकांमध्ये झालेल्या निवडणुकात तब्बल 25 महापालिकांवर भारतीय जनता पक्षाने वर्चस्व मिळवले असून ही उल्लेखनीय कामगिरी आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आणि मतदारांचे आभार मानले.
छोट्या राज्यांपेक्षा अधिक रकमेचा अर्थसंकल्प असलेली आणि देशातील सर्वात श्रीमंत असलेली मुंबई महापालिका भाजप शिवसेना शिंदे गटाच्या महायुतीने जिंकली आहे. या ठिकाणी तब्बल 25 वर्ष असलेली शिवसेनेची सत्ता भाजपाने आपल्याकडे खेचून आणली आहे. या महापालिकेत 90 जागांवर विजय मिळवून भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे तर शिवसेना शिंदे गटाने 28 जागांवर विजय मिळवला आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन महत्त्वाच्या महापालिकांमध्ये ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांनी एकत्र येऊन महायुतीच्या विरोधात निवडणूक लढवली. मात्र, त्यांना फारसा प्रभाव पडता आला नाही. पुणे महापालिकेत भाजपने 90 पेक्षा अधिक तर पिंपरी चिंचवड मध्ये 85 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
ठाणे महापालिकेत शिवसेना शिंदे गटाने 131 पैकी 38 तर भाजपने 24 जागा जिंकून सत्तेवर दावा केला आहे. नवी मुंबई महापालिकेत भारतीय जनता पक्षाने 66 तर शिवसेनेने 42 जागा जिंकले आहेत.
