Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांच्या स्मृतिदिनी शैक्षणिक सुविधा उपक्रमाचे भूमिपूजन


पुणे: पद्मविभूषण मा. डॉ. मोहन धारिया यांच्या स्मृतिदिनानिमित्त समाजोपयोगी कार्याची परंपरा पुढे चालवत एक अर्थपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. शैक्षणिक सुविधा उपक्रमांतर्गत टॉयलेट ब्लॉक (संपूर्ण सुविधा असलेला) या बांधकामाच्या भूमिपूजनाचा समारंभ ‘केईएस सी. के. गोयल आणि टिकराम जगन्नाथ कनिष्ठ महाविद्यालय, खडकी, पुणे’ येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या उपक्रमाची अंमलबजावणी ‘देसाई ब्रदर्स लिमिटेड (डीबीएल), पुणे’ आणि ‘वनराई’ संस्था यांच्या संयुक्त प्रयत्नातून होत असून, शैक्षणिक परिसरात मूलभूत सुविधांची उभारणी करून विद्यार्थ्यांसाठी आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याचे हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे.

समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून ‘देसाई ब्रदर्स लिमिटेड’चे सीएसआर प्रमुख मा.श्री. चंद्रकांत रावल तसेच ‘न्यू इंग्लिश स्कूल, माळथन’चे प्राचार्य मा.श्री. संजय चकाणे उपस्थित होते. त्याचबरोबर ‘केईएस’ संस्थेचे पदाधिकारी, ‘वनराई’ संस्थेचे सदस्य, शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.

या उपक्रमाचा उद्देश शाळेच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करून विद्यार्थ्यांसाठी, विशेषतः मुलींसाठी, स्वच्छ, सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरण निर्माण करणे हा आहे. ग्रामीण भागात योग्य स्वच्छतागृहांच्या अभावामुळे अनेक विद्यार्थिनींना शिक्षणात अडथळ्यांचा सामना करावा लागतो. ‘वनराई’ संस्था गेल्या अनेक वर्षांपासून अशा समस्यांवर उपाय म्हणून ग्रामीण शाळांमध्ये स्वच्छतागृहे आणि पाणीपुरवठा सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य सातत्याने करत आहे. या प्रयत्नांमुळे अनेक शाळांमधील विद्यार्थिनींच्या शाळा सोडण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे.

पद्मविभूषण मा. डॉ. मोहन धारिया यांच्या स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम विशेष अर्थपूर्ण ठरला. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत सामाजिक उन्नतीसाठी सातत्याने कार्य करण्याचा संकल्प या प्रसंगी उपस्थितांनी व्यक्त केला. या निमित्ताने रेडिओ टीजे ८९.५ एफएम या वाहिनीवर मा.श्री. अमितजी वाडेकर यांनी डॉ. मोहन धारिया यांच्या जीवनकार्याविषयी आणि समाजासाठी त्यांनी केलेल्या अमूल्य योगदानाविषयी सविस्तर माहिती दिली.

हा उपक्रम शिक्षण, स्वच्छता आणि सामाजिक जबाबदारी या तिन्ही घटकांना एकत्र आणणारा ठरत असून, ग्रामीण आणि शहरी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्याच्या दिशेने एक प्रेरणादायी पाऊल आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading