Saturday, May 9, 2026
BusinessLatest News

मोटोटेक २०२५ – भारताच्या ऑटोमोटिव्ह उत्पादन क्षेत्रात नवकल्पना, शाश्वतता आणि वाढीला चालना

 

पुणे : भारताच्या प्रमुख ऑटोमोटिव्ह एक्स्पो आणि कॉन्फरन्सपैकी एक असलेले मोटोटेक २०२५ चे ९ ऑक्टोबर रोजी पुण्यात भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आले. या दोन दिवसीय परिषदेने तंत्रज्ञान प्रदर्शन, उद्योगतज्ज्ञ संवाद आणि धोरणात्मक सहकार्यांद्वारे नवकल्पना, शाश्वतता आणि औद्योगिक वाढीचा नवा अध्याय उघडला. ओइएम कंपन्या, घटक उत्पादक, ऑटोमेशन नेते, धोरणनिर्माते, संशोधक आणि सप्लाय चेन तज्ज्ञ यांचा सहभाग भारताला जागतिक स्पर्धात्मक ऑटोमोटिव्ह हब बनविण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरला.

परिषदेची सुरुवात अशोक लेलँडचे उपाध्यक्ष आणि सेंट्रल क्वालिटी प्रमुख सचिन गोयल यांच्या “क्वालिटी इन द ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग लँडस्केप” या विषयावरील मुख्य भाषणाने झाली. दिवसभर चाललेल्या सत्रांमध्ये शाश्वत उत्पादन, डिजिटल प्रॉडक्ट डेव्हलपमेंट आणि शॉप-फ्लोर ऑटोमेशन यांसारख्या नव्या संकल्पनांवर भर देण्यात आला, ज्यामुळे डेटा, डिझाइन आणि अचूक अंमलबजावणी यांच्या संगमातून स्पर्धात्मकतेची नव्याने व्याख्या झाली.

परिषदेचे सल्लागार शैलेंद्र गोस्वामी (सीएमडी, पुष्कराज ग्रुप) यांनी सांगितले:
पुणे हे खरे ऑटोमोटिव्ह हब आहे आणि भारत जलदगतीने जागतिक उत्पादन केंद्र म्हणून उदयास येत आहे. २०२० पूर्वी आपला भर देशांतर्गत मागणी आणि पारंपरिक उत्पादन पद्धतींवर होता. पण कोविडनंतरच्या ‘चायना+1’ धोरणामुळे भारताला मोठी धोरणात्मक संधी मिळाली. आपली बौद्धिक ताकद आणि जगातील सर्वात मोठे मानव संसाधन यांचा योग्य वापर करून आपण मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढवू शकलो, तर भारत नक्कीच जागतिक मंचावर अग्रस्थानी राहील.

ते पुढे म्हणाले, “उद्योग आता पारंपरिक पद्धतींपासून इंडस्ट्री ४.० आणि ५.० या नव्या युगात प्रवेश करीत आहे—जिथे सायबर-फिजिकल सिस्टीम्ससोबत मानवी बुद्धिमत्ता, नवोपक्रम आणि तत्काळ निर्णयक्षमतेला महत्त्व दिले जाते. एआय-सक्षम स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग आता कल्पना नाही—ती भारतात झपाट्याने स्वीकारली जात आहे. कच्च्या मालातील काही निर्भरता असली तरी क्षमता आणि किंमत-स्पर्धात्मकतेवर भारतीय कंपन्या जागतिक मागण्या पूर्ण करण्यास सक्षम आहेत.”

ते पुढे म्हणाले, “सरकारचे ध्येय स्पष्ट आहे—उत्पादन क्षेत्राचा जीडीपी मधील वाटा २५ टक्क्यांपर्यंत नेणे. त्यासाठी टियर-१, टियर-२, टियर-३ आणि एमएसएमइ पुरवठादारांचे पूर्ण इकोसिस्टम उभारणे आवश्यक आहे. ऑटोमोटिव्ह क्षेत्राचे जीडीपीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहे आणि पुण्याचा क्लस्टर—दोन, तीन चाकी, कमर्शियल वाहन, कार आणि ट्रॅक्टर उत्पादन यांसाठी प्रसिद्ध—हेच ठिकाण अशा चर्चांसाठी योग्य आहे. मोटोटेक सारखी परिषद म्हणूनच अत्यंत गरजेची आहे.”

स्पर्धात्मकतेच्या दृष्टीने पुरवठा साखळीवर बोलताना डॉ. राकेश सिंग (चेअरमन, इन्स्टिट्यूट ऑफ सप्लाय चेन मॅनेजमेंट) म्हणाले:भारत आता जागतिक मागणी भागवणारे मोठे उत्पादन केंद्र बनत आहे, जरी काही महत्त्वाचे घटक अजूनही चीनमधून येतात. देशांतर्गत बाजार झपाट्याने वाढतो आहे—ग्रामीण भागातसुद्धा एसयुव्ही सर्वसामान्य झाली आहे. निर्यातही सातत्याने वाढत आहे.”

ते पुढे म्हणाले, “ही वाढ टिकवण्यासाठी सक्षम, एंड-टू-एंड सप्लाय चेन आवश्यक आहे. सप्लाय चेन म्हणजे फक्त माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे नाही, तर संपूर्ण प्रवाह—सोर्सिंगपासून उत्पादन, वितरण, डिलर आणि ग्राहकांपर्यंत—जो खर्च, गती, विश्वसनीयता आणि नफ्यावर आधारित आहे. तंत्रज्ञान या साखळीचे केंद्र आहे—आय ओ टी , एआय / एमएल , एआर , डिजिटल ट्विन्स, आणि फोरकास्टिंग टूल्सद्वारे कार्यक्षमता वाढवता येते. सप्लाय चेनला नदीसारखा अखंड प्रवाह असावा, अडथळे आले तर प्रणाली अडकते. भारताने स्पर्धात्मक राहायचे असेल, तर ही साखळी जागतिक दर्जाची आणि निर्बाध असावी.”

विद्युतीकरण आणि उद्योजकतेच्या दृष्टीने विचार मांडताना उदय नारंग (सीएमडी, ओमेगा सेइकी मोबिलिटी) म्हणाले:“पुणे आणि महाराष्ट्र दोन्ही पुढचा विचार करणारे आहेत—ऑटोमोटिव्ह तसेच तंत्रज्ञान क्षेत्रात. भारताकडे सध्या एक विलक्षण संधी आहे. इतरांकडून शिका, पण आपला मार्ग स्वतः ठरवा. आपली ताकद म्हणजे तरुण, महत्त्वाकांक्षी लोकसंख्या—आणि त्यात महिलांची वाढती भागीदारी. ही उर्जा फक्त नोकरीत नव्हे, तर उद्योजक निर्मितीत वापरली पाहिजे.”

ते पुढे म्हणाले, “‘देश प्रथम’ हा घोष फक्त शब्दांत न राहता कृतीत उतरायला हवा. जपान, कोरिया, युरोप आणि अमेरिकेसोबत भागीदाऱ्या करा, पण उत्पादन भारतातच करा—फक्त आयात करून असेम्ब्ली नव्हे. मोबिलिटी क्षेत्रात निर्णय टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप (टीसीओ) वर आधारित असतील. इव्ही चे टीसीओ आय सी ओ पेक्षा कमी झाले, तर ग्राहक निश्चित बदल करतील. त्यामुळे गुणवत्ता, विश्वासार्हता आणि सेवेत सुधारणा करणे हे आपले कर्तव्य आहे. संस्थापक ऊर्जा, गंभीर उत्पादन, मजबूत सप्लाय चेन आणि जागतिक सहकार्याने भारत नक्कीच पुढे जाईल.”

प्रदर्शन विभागात युनिव्हर्सल रोबोट्स, एटीआय मोटर्स, ट्रायम टूलरूम, यश डायनॅमिक्स, श्नायडर इलेक्ट्रिक, वॅगो इंडिया, जेंडामार्क, डाल्मेक, श्री रॅपिड टेक्नॉलॉजीज, टासी इंडिया, लाइट मेकॅनिक्स, मार्पॉस आणि इतर कंपन्यांच्या अत्याधुनिक तंत्रज्ञान उपायांचे सादरीकरण करण्यात आले—कोलॅबोरेटिव्ह रोबोटिक्सपासून डिजिटल असेंब्ली आणि क्वालिटी कंट्रोलपर्यंत अनेक क्षेत्रांचा समावेश होता.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading