Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

पी.आय.बी.एम. तर्फे विशेष ‘स्वच्छता अभियान’ आणि ‘स्वच्छता महोत्सव’ चे आयोजन

दोन दिवसांत विद्यार्थ्यांनी दोन किलोमीटर परिसरातून २० ट्रॅक्टर कचरा केला स्वच्छ

पुणे :  पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (पी.आय.बी.एम.), पिरंगुट कॅम्पसद्वारे २५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत विशेष ‘स्वच्छता अभियान’ आणि ‘स्वच्छता महोत्सव’ आयोजित करण्यात येत आहे. आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या राष्ट्रव्यापी आवाहनास अनुसरून, राष्ट्रीय सेवेसाठी आणि स्वच्छतेसाठी वेळ देण्याच्या उद्देशाने हा आठवडाभर चालणारा उपक्रम आयोजित केला गेला आहे; याची सांगता गांधी जयंतीच्या दिवशी होणार आहे, अशी माहिती पी.आय.बी.एम. ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे चेअरमन आणि कार्यकारी संचालक रमन प्रीत यांनी दिली.

संस्थेतील बहुसंख्य विद्यार्थी स्वयंसेवक या संपूर्ण आठवड्यात समर्पित ‘श्रमदान’ कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवणार आहेत. विद्यार्थी लवासा लिंक रोड,  पिरंगुट खिंड  पिरंगुट कॅम्पस परिसर, भुगाव आणि भूकूम  महामार्ग व संलग्न परिसरातील सार्वजनिक ठिकाणे तसेच प्रमुख रस्त्यांच्या स्वच्छतेवर या अभियानामध्ये भर देत आहेत. मागील दोन दिवसांत विद्यार्थ्यांनी स्थानिक ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मदतीने तब्बल १५ ते २०  ट्रॅक्टर कचरा गोळा करून परिसर स्वच्छ केला. संस्थेचे डॉ. बी. नरेश, जिवनसिंग ठाकूर, प्रा. मयूरेश शेंदुर्णीकर, दत्ता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ध्रुवी चावडा, पर्ल सांकला, प्रखर परांजपे, श्वेता तिवारी हे विद्यार्थी स्वच्छता मोहिमेचे नेतृत्व करत आहेत.

या उपक्रमाबद्दल आपले मत व्यक्त करताना, पी.आय.बी.एम. ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे चेअरमन आणि कार्यकारी संचालक,   रमन प्रीत म्हणाले, “आमची संस्था नेतृत्वाच्या प्रशिक्षणाचा मूळ घटक म्हणून सामाजिक जबाबदारीकडे पाहते. या ‘स्वच्छता महोत्सवा’मध्ये सक्रिय सहभाग घेऊन, आम्ही आमच्या भावी व्यवस्थापकांमध्ये सक्रिय देशभक्तीची आणि सामुदायिक मालकीची प्रबळ भावना रुजवू इच्छितो. हा उपक्रम समाजाला ऋण फेडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

या स्वच्छता अभियांना विषयी बोलताना ध्रुवी चावडा, पर्ल सांकला, प्रखर परांजपे, श्वेता तिवारी हे विद्यार्थी म्हणाले की,  महाविद्यालयाने केलेल्या आवाहनानुसार ३०० पेक्षा अधिक विद्यार्थी या मोहिमेत सहभागी झाले आहेत, काल ७० आणि आज ७० मुले – मुली या अभियानात सहभागी झाले होते, पुढील दिवसांत उर्वरित विद्यार्थी  सहभागी होणार आहेत. या परिसरात स्थानिक सोसायट्या,  औद्योगिक कंपन्या आणि हॉटेल्स चा कचरा या परिसरात टाकला जातो, ग्राम पंचायत प्रशासनाने सूचना केलेल्या असल्या तरी कचरा मोठ्या  प्रमाणावर इथे टाकला जात आहे, याला आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही बसविण्याची आणि दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading