अवयवदान प्रक्रियेच्या प्रचार – प्रसाराची आवश्यकता
ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. माया तुळपुळे यांच्या हस्ते आरती गोखले यांना यावर्षीचा दुर्गा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दहा हजार रुपये रोख, मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी हिंदू महिला सभेच्या अध्यक्ष सुप्रिया दामले उपस्थित होत्या. नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या माळेचे उद्घाटन ‘सखी रथ’ च्या दीपाली कडू यांच्या हस्ते झाले.
डॉ. माया तुळपुळे म्हणाल्या, “अवयवदान हे जिवंतपणी (रक्तदान, कीडनी) आणि मेंदूमृत, अशा दोन्ही अवस्थेत करता येते. श्रीलंकेत नेत्रदान सक्तीचे आहे, ते अन्य देशांना हे दान निर्यात करतात, हे आपण जाणून घेतले पाहिजे. जगातील अनेक देशांत अवयवदानाची चळवळ रुजली आहे. आपल्याकडे ती मोठ्या प्रमाणात रुजवण्याची गरज आहे. आम्ही स्थापन केलेल्या ‘श्वेता असोसिएशन’च्या माध्यमातून कोडाविषयीचे गैरसमज, कोडाला कलंक मानण्याची समाजाची मानसिकता आणि कोडाविषयीचे गैरसमज, दूर करण्याचा प्रयत्न केला जातो’.
दीपाली कडू यांनी ‘सखी रथ’ या संकल्पनेची माहिती दिली. उत्तम शिक्षण असूनही वेगळे काही करण्याची उर्मी असल्याने महिलांना ड्रायव्हिंग शिकवण्याचे कार्य या संस्थेने सुरू केले. दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी, चालविण्याचे प्रशिक्षण सखी रथच्या माध्यमातून करत असल्याचे त्या म्हणाल्या. या क्षेत्रातही मनुष्यबळाची फार गरज अहे, असे त्यांनी सांगितले.
सुप्रिया दामले यांनीही अवयवदान ही चळवळ व्हावी आणि अवयवदानाचे प्रमाण वाढावे, यासाठी प्रयत्न करण्याची गरज अधोरेखित केली.
उत्तरार्धात स्वरमयी प्रस्तुत गीतगुंजन हा सुगम संगीतातील गीत प्रकारांवर आधारित हिंदी व मराठी गीतांचा कार्यक्रम राजश्री ताम्हनकर आणि सहकलाकारांनी सादर केला. वंदना जोगळेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
