Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

‘वसुधैव कुटुंबकम’ ही संकल्पना अंधश्रद्धा नसून हिंदुत्वाचा सर्वोच्च बिंदू – संजय उपाध्ये

पुणे : प्रत्येक हिंदू ने आपल्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी शास्त्राचा आधार घेणे महत्त्वाचे आहे. कृतज्ञता भाव जपला तरच संस्कृती टिकून राहील. यासाठी प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच ‘वसुधैव कुटुंबकम’ ही संकल्पना अंधश्रद्धा नसून हिंदुत्व वादाचा सर्वोच्च बिंदू आहे, असे मत ज्येष्ठ लेखक, कवी संजय उपाध्ये यांनी व्यक्त केले.

गेल्या १२०० वर्षांत परकीय आक्रमणात वीरगती प्राप्त झालेल्या ज्ञात-अज्ञात हिंदू धर्मवीरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अरुंधती फाऊंडेशन आणि हेरिटेज क्लब तर्फे सर्वपित्री अमावस्ये निमित्त ‘सामूहिक तर्पण संस्कार विधी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री देवदेवेश्वर संस्थानचे विश्वस्त रमेश भागवत, अरुंधती फाऊंडेशनचे हिमांशू गुप्ते, आदित्य गुप्ते, उमेश पोटे, उद्योजक मयूरेश भिसे, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना संजय उपाध्ये म्हणाले, हिंदू समुदायाने संस्कृतीचे जतन करण्याची आता गरज आहे. भक्तीचे जतन करत असताना शास्त्र समजून घेणे गरजेचे आहे. इतिहास बदलला तर भूगोल बदलतो हा अनुभव आहे. परंतु माणूस हा इतिहास विसरतो आणि बदललेला भूगोल लक्षात घेत नाही. स्वातंत्र्योत्तर काळानंतर साक्षरतेच्या कल्पना बदलल्या; त्यामुळे राष्ट्रगीत व राष्ट्रीय अस्मितेकडे काहीसे दुर्लक्ष झाले आहे. आता या संस्कृतीचे जतन करण्यासाठी घराघरातून जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. तर्पण विधी हा श्रद्धा आणि स्मरणाबरोबरच संकल्प सिद्धीचा विषय आहे. सध्याच्या युगामध्ये सर्व जण संकुचित विचाराने जगत असून आत्मकेंद्रीत झाली आहे. हिंदू संस्कृतीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रत्येकाने वेळ देण्याची आता गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

अरुंधती फाउंडेशनचे आदित्य गुप्ते म्हणाले, गेल्या बाराशे वर्ष हिंदू समाजावर खूप आक्रमणे झाली. त्यात वीरगती प्राप्त झालेल्या तीस कोटी लोकांची तर्पण करणारे कोणीही राहिले नाही. हाच कृतज्ञ भाव राखण्यासाठी तर्पण विधीचे आयोजन सामूहिक पातळीवर करण्याचे आयोजन संस्थेतर्फे दरवर्षी केले जाते. हिंदू संस्कृतीचे जतन करण्याचा यामागे उद्देश आहे.

रमेश भागवत यांनी धर्मप्रचार करण्यासाठी आठवड्यातील एक दिवस तरी सामूहिक प्रार्थना करण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच यात सक्रिय सहभाग घेण्याचे याप्रसंगी आवाहन केले.

याप्रसंगी दिवंगत ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहंदळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. हिमांशू गुप्ते यांनी प्रास्ताविक केले तर विनय वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचा समारोप ‘ हीज स्टोरी ऑफ इतिहास’ या सत्यघटनेवर आधारित चित्रपटाने झाला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading