Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे तरुण वैभवशाली भारत घडवतील – अविनाश धर्माधिकारी

पुणे :  स्वामी विवेकानंद यांनी तत्वनिष्ठ आणि विवेकनिष्ठ विचार देऊन केवळ भारताच्याच नव्हे तर जगाच्या वाटचालीला एक वेगळी दिशा दिली. त्यांचे विचार आत्मसात करून त्याप्रमाणे आपण आपल्या स्वतःच्या आयुष्यात काही घडवू शकतो का?  असा विचार करणारा तरुण निर्माण झाला पाहिजे. स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे तरुणच उद्याचा वैभवशाली भारत घडवू शकतील, असा विश्वास माजी सनदी अधिकारी आणि चाणक्य मंडळ संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मएसो सिनियर कॉलेज तर्फे राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित  व्याख्यानमालेमध्ये विश्वबंधुत्व दिनानिमित्त अविनाश धर्माधिकारी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रवींद्र वैद्य, उपप्राचार्या डॉ पूनम रावत, नागेश पाटील, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा रवींद्र गोरे यावेळी उपस्थित होते.

अविनाश धर्माधिकारी म्हणाले, आपण तत्वनिष्ठ आणि विवेकनिष्ठ तसेच विज्ञाननिष्ठ तरुण पिढी कसे घडवू शकतो यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. या विचारांवर तयार होणारी पिढी खऱ्या अर्थाने उद्याचा बलशाली भारत घडवणार आहे. आजच्या तरुणांनी  कोणत्यातरी एका विषयाचा ध्यास घेतला पाहिजे आणि त्यामध्ये स्वतःला झोकून देऊन स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली पाहिजे. व्यसनांची प्रतिष्ठा वाढत असणाऱ्या आजच्या समाजामध्ये कार्याला आणि प्रामाणिकपणाला महत्त्व आले तर खऱ्या अर्थाने तरुण पिढी चांगल्या मार्गाला लागू शकेल असा विश्वासही अविनाश धर्माधिकारी यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading