Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

ढोल ताशा पथकांना जास्तीत जास्त परवानग्या मिळवून देऊ – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पुणे : विविध क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटनाला महाराष्ट्राचे प्रमुख वाद्य म्हणून ढोल ताशा पथकांचे वादन व्हावे, सरकारी कार्यक्रम अथवा विविध देशांचे राजदूत अथवा पाहुणे आल्यानंतर आवर्जून ढोल ताशा वाद्ना त्यांना ऐकवले जावे, गणेशोत्सवाच्या अगोदर दीड महिना वादनाला सायं. ६ ते रात्री ९.३० पर्यंत परवानगी मिळावी, यांसह ढोल ताशा पथकांच्या अनेक मागण्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवून ढोल ताशा पथकांना जास्तीत जास्त परवानग्या मिळवून देऊ. या मागण्यांसंदर्भात लवकरच बैठक घेतली जाईल, असे आश्वासन राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

ढोल ताशा महासंघ महाराष्ट्र च्या वतीने महाराष्ट्रातील ढोल ताशा पथकांच्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन बीएमसीसी कॉलेज आॅफ कॉमर्स येथील टाटा हॉल मध्ये करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. प्रताप परदेशी, प्राचार्य डॉ. राजेश सुपेकर, महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, सुभाष लाडे उपस्थित होते.

अधिवेशानिमित्त आयोजित छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते झाले. त्यानंतर वाद्य पूजन, दीपप्रज्वलन, प्रतिमा पूजन व महाराष्ट्र गीत सादरीकरणाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. दुस-या सत्राच्या सुरुवातीला चंद्रशेखर बावनकुळे यांसह राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार हेमंत रासने, राजेश पांडे, धीरज घाटे आदी उपस्थित होते. नागपूर, नाशिक, मुंबई , ठाणे , पिंपरी चिंचवड, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा २० जिल्ह्यांतील २५० पथकातील प्रतिनिधींनी सहभाग घेतला.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, महाराष्ट्राचा हा गजर देशातच नव्हे तर जगात पोहोचवायचा आहे. ढोल ताशा हा आपल्या सांस्कृतिक उत्सवाचा आत्मा आहे. ढोल ताशा परंपरेचे उगमस्थान पुणे असून ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. त्यामुळे हा अनमोल ठेवा पुढे नेण्याची जबाबदारी आपली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, पुढील काही दिवसात प्रत्येक ढोल ताशा पथक आणि पोलीस स्टेशन याप्रमाणे ज्या ज्या केसेस आहेत, त्या निकाली काढू. तसेच, काही न्यायालयात असतील तर त्यावर ही मार्ग काढू. वाद्य वाजविणे हे आत्मिक समाधान आहे. त्यामुळे या वादनात वैविध्य आणणे आवश्यक आहे. यंदाच्या वर्षी प्रत्येक पथकाने एक नवीन वाद्य पथकात समाविष्ट करावे.

पराग ठाकूर म्हणाले, ढोल-ताशा सोबत घुंगुर काठी, लेझीम, लाठी-काठी, झांज, टिपरी यांचा समावेश पथकांनी करायला हवा. ढोल-ताशा वादनाला गुरुपौर्णिमेपासून दीड महिना सरावाला जागा आवश्यक असतात. मात्र, जागा मिळत नसल्याने अडचण निर्माण होते. त्याकरिता नदी काठ, मनपा व जिल्हा परिषद शाळांचे प्रांगण, पीडब्ल्यूडी च्या जागा मिळण्यास प्रयत्न व्हायला हवेत. राज्यात १ हजार ढोल-ताशा पथके असून दीड लाख वादक वादन करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. अ‍ॅड. शिरीष थिटे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading