छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र म्हणजे पाचवा वेद – व्याख्याते पराग ठाकूर
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, स्वराज्याचे रक्षण छत्रपती संभाजी महाराजांनी केले आणि त्याचे साम्राज्य श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी यांनी उभारले. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र म्हणजे पाचवा वेद आहे. आपल्या संस्कृतीतील चार वेदांप्रमाणे या वेदाचा देखील अभ्यास प्रत्येकाने करायला हवा, असे मत व्याख्याते पराग ठाकूर यांनी व्यक्त केले.
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स तर्फे शिवजयंतीनिमित्त ‘जाणता राजा’ याविषयावरील व्याख्यानाचे आयोजन संस्थेच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अॅड.शार्दुल जाधवर उपस्थित होते. संस्थेतर्फे शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचे देखील आयोजन करण्यात आले होते.
पराग ठाकूर म्हणाले, आमच्या देव्हाऱ्यातील देव शिवरायांमुळे सुरक्षित राहिले. छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी किती असावी, हे आपल्याला पाहायला मिळते. युद्ध हे लढण्यास आणि सरकार हे चालविण्यास असते, ते शिवरायांनी शिकविले. शिवरायांवर कोणीही टीका लिहून ठेवली नाही. परदेशी लेखकांनी देखील नाही. इतिहास वाचल्याशिवाय भविष्य घडणार नाही. देव देश, धर्म आणि स्वराज्याला सोन्याच्या सिंहासनावर बसविण्याकरिता शिवरायांनी कार्य केले.
ते पुढे म्हणाले, प्रत्येक युद्धात अग्रभागी असलेले राजे म्हणजे शिवाजी महाराज आहेत. शिवरायांचे चरित्र निष्कलंक आहे. त्यांच्यावर लोकांची श्रद्धा आहे. रयतेच्या मनातील स्वराज्य त्यांनी निर्माण केले. रयतेच्या भाजीच्या मिठाची काळजी घेणारे राजे हे शिवाजी महाराज होते, याबाबतची अनेक उदाहरणे इतिहासात सापडतात. नीतीवंत, न्यायवंत राजे म्हणून त्यांनी अनेक नवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती घेत आरमार, तोफा यांची उभारणी केली.
प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर म्हणाले, शिवरायांच्या जीवनातून आपल्याला प्रेरणा मिळेल, एवढी शक्ती त्यांच्या चरित्रात आहे. त्यांच्यातील काही गुण आपल्यामध्ये आहेत का? याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. समाज गुण्यागोविदानाने नांदायचा असेल, तर शिवरायांचे विचार अमलात यावे.
अॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, छत्रपतींचे विचार आणि आचार आपल्या आयुष्यात घेणार आहोत का? हा विचार आपण करायला हवा. केवळ शिवरायांसारखी वेशभूषा करून मिरवणे म्हणजे शिवजयंती साजरे करणे नव्हे. केवळ मिरवणूक, फटाके यापर्यंत मर्यादित न राहता शिवरायांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचावे, याकरिता हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो. आज जातीयवाद वाढलेला दिसतो. शिवरायांनी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली. त्याच महाराष्ट्रात हा जातीयवाद सुरु आहे, हे दुदैवी आहे.
