पं. उल्हास कशाळकर यांच्या परिपक्व गायनाने गानसरस्वती महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा सुरेल समारोप
पुणे : गानसरस्वती महोत्सवाच्या पहिल्या दिवसाच्या शेवटी ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर यांनी गायिलेला राग बिहागडा आणि राग काफी कानडा रसिकांना आगळावेगळा श्रवणानंद देणारा ठरला. गानसरस्वती महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर यांच्या परिपक्व गायनाने झाला. राग ‘बिहागडा’ मध्ये त्यांनी तीन बंदिशी सादर केल्या. ‘प्यारी पग होले’ ही पारंपरिक रचना विलंबित तीनतालातील होती. ‘पाती नवेली’ ही बंदिश आणि त्याला जोडून एकतालात ‘सखी मंदिरवा मोरे आये’ ही रचना त्यांनी ऐकवली.
त्यानंतर ‘काफी कानडा’ या रागात ‘मोरे घर आये’ हा ख्याल विलंबित तीनतालात त्यांनी पेश केला. ‘सावरिया तोरे बिना मोहे’ ही त्रितालातील द्रुत बंदिश त्यांनी अतिशय ढंगदारपणे सादर केली. ‘नटकामोद’ रागातील ‘नेवर बाजो’ ही तीनतालातील बंदिश आणि ‘साची कहो तुम प्यारे’ ही रचना सादर केल्यानंतर ”करन मोरी लागली कन्हैया’ ही भैरवी रचना गाऊन पं. कशाळकर यांनी गायनाचा समारोप केला.
त्यांना तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांनी तबल्याची तर सुयोग कुंडलकर यांनी हार्मोनियमची अतिशय रंगतदार साथ केली. साईऐश्वर्य महाशब्दे आणि अद्वैत केसकर यांनी तानपुरा साथ केली.
विघ्नेश जोशी यांनी सूत्रसंचालन केले.
