मराठी परदेशी उद्योजकांसाठी मंत्रालयाचा स्वंतंत्र विभाग निर्माण करणार – उदय सामंत
पुणे : परदेशातील नोकऱ्यांबरोबरच आता उद्योगविश्वातही मराठी माणसाचे पाउल पुढे पडत आहे. मराठी माणसाला उद्योग व्यवसायामध्ये महत्त्वाची मदत व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकार लवकरच परदेशी उद्योजकांसाठी मंत्रालयाचा एक स्वतंत्र विभाग निर्माण करणार असल्याची घोषणा उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली. ते पुण्यात जागतिक उद्योजकता परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर जेष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, पद्मश्री प्रतापराव पवार, जेष्ठ विचारवंत तथा लेखक संदीप वासलेकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, ‘गर्जे मराठी’ चे संस्थापक अध्यक्ष आनंद गानू, महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेचे (एमइडीसी) अध्यक्ष अतुल शिरोडकर, पिंपरी चिंचवड ट्रस्टच्या उपाध्यक्षा पद्मजा भोसले, गिरीश देसाई, कार्यक्रमाचे संयोजक सचिन इटकर यांसह देशातील आणि परदेशातील विविध क्षेत्रातील प्रमुख उद्योजक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात विचार व्यक्त करताना ‘गर्जे मराठी’ संस्थेचे आनंद गानू यांनी परदेशातील मराठी उद्योजक, त्यांच्या मुलांना देशात यायचे असेल किंवा देशासाठी काहीतरी करायचे आहे त्यांच्यासाठी राज्यात एखादे स्वतंत्र मंत्रालय किंवा विभाग स्थापन करावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली होती. त्या आवाहानाला सकारात्मक उत्तर देत सामंत म्हणाले, की उद्योजकांसाठी मंत्रालयाचा एक स्वतंत्र विभाग निर्माण करू. आता राज्यात स्थिर सरकार आले आहे. नवीन उद्योजकांना उद्योगांसाठी तात्काळ परवानगी मिळावी व त्यांचा कमी त्रास व्हावा म्हणून मंत्रालयात ‘फाईल ट्रॅकिंग सिस्टम’ येत्या दोन महिन्यांत कार्यान्वित होईल. यातून कामाची फाईल कोणाकडे किती काळ पडून राहते हे कळून ती तातडीने मंजूर करण्यात येईल. राज्यात उद्योगात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असून महराष्ट्र राज्य परकीय गुंतवणुकीत देशात एक नंबरवर आहे. रतन टाटा यांच्या मदतीने गडचिरोली, रत्नागिरी, पुणे येथे स्किल सेंटर चे काम चालू आहे. यातून दरवर्षी पाच हजार कौशल्य असलेले तरुण दरवर्षी तयार होतील.
यावेळी पद्मश्री प्रतापराव पवार म्हणाले की, बारामती येथे ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टद्वारा संचालित कृषी विज्ञान केंद्रामार्फत कृत्रिम प्रज्ञा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) चा वापर करून कमी खर्चात उसाची शेती विकसित केली गेली आहे. तसेच त्यामुळे शुगर कंटेंटमध्येही वाढ झाली आहे. खेडयापाडयातील गरीब विद्याथ्र्यांना शिकण्यासाठी पुण्यात विद्यार्थी सहायक समिती असून त्याद्वारे गरीब विद्यार्थी हे उद्योजक घडलेले आहेत. मराठी उद्योजकांबरोबर सकाळ ग्रुप कायम असेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
अतुल शिरोडकर म्हणाले की, मविचारी संस्था एकत्र आणून त्यांना महाराष्ट्राशी व जगाशी जोडण्याचे काम या उपक्रमाद्वारे केले जात असल्याचे स्पष्ट केले. सरकारी धोरणांचे लेखापरीक्षण करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. तर हर्षवर्धन पाटील यांनीही शिक्षण व उद्योगांनी हातात हात घालू काम करण्याची गरज व्यक्त केली. तर ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी अशा प्रकारच्या परिषदांचा उद्देश हा नवीन कल्पनांना वाव देण्याचे महत्व अधोरेखित केले. गेल्या काळात उद्योजगतेला वाव मिळाला असून आठवडयाला १ युनिकॉर्न तयार होत असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच, येणा–या काळात ‘इनोव्हेशन’ नवकल्पना यांना खूप महत्व असल्याचे स्पष्ट केले. तंत्रज्ञान हे भारताचे भविष्य असून नवीन पीढी ही नोकरी करण्यऐवजी स्वतःचा उद्योजक होण्याचे स्वप्न पाहत असलयाचे त्यांनी सांगितले.
ऑटोमोबाईल उद्योगाचा विकास तिप्पटः नितीन गडकरी
अमेरिकेत मराठी माणूस मोठया उद्योगात आघाडीच्या पदावर आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात खूप चांगले काम करत आहे. भारतात ऑटोमोबाईल हब तयार झाले. दळनवलंन सुविधा आहेत. जोपर्यंत उद्योग येणार नाही तोपर्यंत रोजगार येणार नाही व गरिबी दूर होणार नाही. सध्या बायो फ्युएल, हायड्रोजन फ्युएल तयार करण्यात येत आहे. येणाऱया काळात विकासाचा मापदंड हा निर्यात वाढवणे आहे. आता स्थिर सरकार आले आहे, आता आम्ही व्यवस्थित पार पाडू असेही ते म्हणाले. महाराष्टात जंगल ,पाणी तसेच निसर्गसंपदा मोठ्या प्रमाणात आहे .त्यामुळे येथे पर्यटन उद्योगाला फार मोठी संधी आहे . त्यामुळे येथील सर्व स्तरातील लोकांना याचा फायदा होईल .यावेळी त्यांनी नागपुरातील गोसे खुर्द येथील पर्यटन तयार कसे केले त्याचे उदाहरण दिले .
