कांचन कुलकर्णी यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन
पुणे : समाजमाध्यमातून लोकांपर्यंत पोहचत असलेल्या विविध विषयांवरील फोटोमधून व्यक्त होणाऱ्या भावना कवितांच्या रूपात पोहचविणाऱ्या निःशब्द-शब्द या कवी कांचन कुलकर्णी लिखित काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच पार पडले. हा कार्यक्रम कोथरूड येथील उत्सव सभागृह येथे पार पडला. माजी सनदी अधिकारी आणि चाणक्य मंडळ,पुणेचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.याप्रसंगी कवी कांचन कुलकर्णी, प्रकाशक व लँग्वेज अम्ब्रेलाच्या संस्थापिका ललिता मराठे उपस्थित होत्या. सूत्रसंचालन आदित्य सायगांवकर यांनी केले. पुस्तकाचे प्रकाशन लँग्वेज अम्ब्रेला या संस्थेने केले.
समाज माध्यमातून अनेक विषयांवर थक्क करणारे फोटो पाहायला मिळतात,कधी सामाजिक,कधी निसर्गावर तर कधी मानवी जीवनावर.हे निःशब्द व अतिशय बोलके फोटो मला शब्द लिहायला प्रवृत्त करतात.असेच काही फोटो आणि त्यावर शब्दात व्यक्त झालेल्या भावना याचा प्रत्यय पुस्तकात येईल,अशी माहिती कवी कांचन कुलकर्णी यांनी दिली.
याप्रसंगी बोलताना ललिता मराठे म्हणाल्या की ,फोटो बघून सर्वसामान्य माणसाच्या मनात भावना उमटतात,पण त्याला त्या तितक्या ताकदीने व्यक्त करता येतीलच असे नाही. मात्र कांचन कुलकर्णी यांनी शब्दातून मांडलेल्या भावना खूप काहीतरी गहिरं सांगून जातात.या पुस्तकात भक्तीरस,वीररस,कारूण्य,निसर्गवर्णन,गूढ ,मनुष्य स्वभाव आणि मानवी भावनांच्या विविध छटा अनुभवता येणार आहेत.
पुस्तक प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष अविनाश धर्माधिकारी याप्रसंगी म्हणाले की कांचन यांची कविता प्रगल्भ आहे. त्यांच्या लेखनात जीवनातील वेगवेगळ्या विषयांचे प्रतिबिंब दिसते. त्यांच्या या व्यासंगाला त्यांनी शुभेच्छा दिल्या.
धर्माधिकारी यांनी पुस्तकाची आवडलेली संकल्पना, त्यातल्या भावलेल्या विविध कविता आणि एका लयीत येणाऱ्या वृत्तबद्ध कविता यावर भाष्य केले. सर्व कविता चांगल्या असून काही कविता अत्यंत हृदयस्पर्शी आहेत असं सांगत कांचन कुलकर्णी यांना शुभेच्छा दिल्या.
