Bangladesh – भारतीय उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची सूचना
ढाका: आम्हाला भारतीय उत्पादनांची आवश्यकता नाही. वेळ पडली तर एक वेळ जेवून पण आत्मनिर्भर राहू, अशी दर्पोक्ती करतानाच बांगलादेश नॅशनॅलिस्ट पक्षाचे सरचिटणीस रुहुल कबीर रिझवी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना भारतीय उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची सूचना केली.
बांगलादेशात तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांना सत्ता सोडण्यास भाग पाडल्यानंतर भारताबद्दल द्वेष भावना वाढीस लागली आहे तर पाकिस्तानचा प्रभाव वाढत आहे. अल्पसंख्या समाजावर सातत्याने हल्ले होत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता भारतीय उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन रिझवी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य जनतेलाही केले आहे.
त्रिपुरा येथे असलेल्या बांगलादेशी उच्चायुक्तालयाची तोडफोड करून बांगलादेशच्या राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याच्या कथित प्रकरणाचा निषेध म्हणून बांगलादेश नॅशनल पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाच्या वेळी रिझवी यांनी भारता विरोधात गरळ ओकली. यावेळी त्यांनी आपल्या पत्नीच्या भारतीय बनावटीच्या साडीचे प्रतिकात्मक दहनही केले.
या पुढील काळात आमच्या माता भगिनी भारतीय साड्या परिधान करणार नाहीत. आम्ही भारतीय टूथपेस्ट अथवा साबण वापरणार नाही. आमच्यासाठी आवश्यक असलेल्या मिरच्या आणि पपईचे उत्पादन आम्ही आमच्या देशात करू. ज्यांनी आमच्या राष्ट्रध्वजाचा अवमान केला त्यांचे कोणतेही उत्पादन आम्ही वापरणार नाही. भारत आणि बांगलादेशच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले आहे. आम्ही त्यांच्या उत्पादनांवर बहिष्कार घालू, असेही रिझवी म्हणाले.
