Wednesday, June 17, 2026
ENTERTAINMENTLatest News

चाळीस वर्षांनी ‘पुरुष’ पुन्हा एकदा गाजवणार मराठी रंगभूमी


१४ डिसेंबरला सादर होणार पहिला प्रयोग

जयवंत दळवी यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘पुरुष’ या नाटकाने एकेकाळी मराठी रंगभूमी गाजवली. स्त्री- पुरुष संबंध, सामाजिक विषमता आणि स्त्री च्या संघर्षाची कथा यात दाखवण्यात आली होती. नाटकातील संवेदनशील आणि सामाजिक संवादामुळे त्यावेळी हे नाटक मराठी रंगभूमीवर एक मैलाचा दगड ठरले होते. मराठी रंगभूमीवरील ही महत्वपूर्ण कलाकृती सुमारे चाळीस वर्षांनंतर नाट्यप्रेमींना पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. मोरया प्रॉडक्शन्स, भूमिका थिएटर्स, अथर्व थिएटर्स निर्मित, जाई काजळ प्रस्तुत ‘पुरुष’ हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येण्यासाठी सज्ज झाले असून येत्या १४ डिसेंबर रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग सादर होणार आहे. राजन ताम्हाणे दिग्दर्शित, जयवंत दळवी लिखित या नाटकाचे शरद पोंक्षे, श्रीकांत तटकरे, समिता भरत काणेकर निर्माते आहेत. या नाटकात स्पृहा जोशी, अविनाश नारकर, अनुपमा ताकमोगे, निषाद भोईर, नेहा परांजपे आणि शरद पोंक्षे प्रमुख भूमिकेत दिसतील. या नाटकाला विजय गवंडे यांचे संगीत लाभले आहे.

स्त्री पुरुष समानता, स्त्रीची अस्मिता, समाजातील पुरुषप्रधान मानसिकतेवर टीका, सामाजिक स्थितीवर भाष्य हे विषय या कथेच्या केंद्रस्थानी असून ते प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडणारे आहेत.

‘पुरुष’ हे नाटक परत रंगभूमीवर आणण्याबद्दल निर्माते शरद पोंक्षे म्हणतात, ” आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मराठी भाषा ज्या असंख्य साहित्यिकांनी समृद्ध केली. त्यातील एक अजरामर नाव म्हणजे नाटककार जयवंत दळवी. आजवर त्यांनी विविध विषयावर नाटकं, कथा कादंबऱ्या लिहिल्या. त्यापैकीच एक ८० च्या दशकातील अतिशय गाजलेलं नाटक ‘पुरुष’. आज त्या नाटकाला ४० वर्षे उलटून गेली असून तेच नाटक जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आम्ही पुन्हा रंगमंचावर आणत आहोत. या नाटकाचे केवळ ५० प्रयोग होणार असून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात याचे प्रयोग होणार आहेत. त्यामुळे ही सुंदर कलाकृती आम्ही नाट्यप्रेमींसमोर घेऊन येण्यासाठी प्रचंड आतुर आहोत. हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर आणण्याचे आणखी एक कारण म्हणजे आजही समाजात अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे आणि ही स्थिती मला कायमच अस्वस्थ करते. हीच विचारसरणी बदलण्यासाठी आम्ही हे नाटक घेऊन आलो आहोत. ‘पुरुष’मध्ये केवळ सामाजिक प्रश्न हाताळण्यात आला नसून यात त्याचे उत्तरही दडलेले आहे.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading