ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे दीर्घ आजाराने निधन
मुंबई: मराठी रंगभूमी आणि चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे दीर्घ आजाराने आज पहाटे निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी व मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे मराठी नाट्य व चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
कदम हे दीड वर्शासून कर्करोगाशी झुंज देत होते. उपचार सुरू असतानाच अंधेरी येथील राहत्या घरी कदम यांचे निधन झाले. आज दुपारी अंधेरी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्रात लोकप्रियतेचे शिखर गाठलेल्या ‘विच्छा माझी पुरी करा’ या लोकंनाट्यामुळे कदम यांचे नाव मराठी भाषिकांच्या घराघरात पोहोचले. हजरजबाबी संवाद आणि सहज सुंदर अभिनय यामुळे ते लोकप्रिय झाले. आम्ही दोघे राजा राणी’, ‘चष्मेबहाद्दर’, पोलीसलाईन’,हळद रुसली कुंकू हसलं यांसारख्या अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका ही गाजल्या. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
