वारकरी कीर्तन परंपरेस संत नामदेवांनी संजीवनी देण्याचे कार्य केले – डॉ. अरुणा ढेरे
पुणे : महाराष्ट्राच्या वारकरी कीर्तन परंपरेस संत नामदेवांनी संजीवनी देण्याचे फार मोठे कार्य केलेले आहे. महाराष्ट्राला फार मोठी संत परंपरा लाभली आहे. संत नामदेवांनी उत्तर भारतात भागवत धर्माचा प्रचार-प्रसार केल्यामुळे या भागात शांतता, समता प्रस्थापित झाली, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अरुणा ढेरे, यांनी केले.
त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेवांच्या ६७४ व्या समाधीसोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. यानिमित्त विद्यापीठाच्या खेर वाङ्मय भवनातील संत नामदेव सभागृहाबाहेरील संत नामदेवांच्या प्रतिमेला कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, व प्र – कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासनामार्फत आधुनिक पद्धतीने संशोधन व्हावे यासाठी विद्यापीठ आग्रही राहील असे यावेळी कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांनी सांगितले. याप्रसंगी रासेयो चे संचालक प्रा. डॉ. सदानंद भोसले, हिंदी विभागप्रमुख प्रा. डॉ. विजयकुमार रोडे तसेच विविध प्रशासकीय व शैक्षणिक विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यापीठाने हाती घेतलेल्या ‘सार्थ श्री नामदेव गाथा’ या प्रकल्पाचे संपादक डॉ. ओमश्रीश श्रीदत्तोपासक यांनी केले.
खेर वाङ्मय भवनातील संत नामदेव सभागृहाबाहेरील संत नामदेवांचे तैलचित्र पुण्यातील “नामदीप संस्थेने” देणगी म्हणून दिलेले आहे. सदर संस्थेचे विद्यमान कालेकर कुटुंबीय तसेच नामदेव समाजातील मान्यवर व्यक्ती याप्रसंगी उपस्थित होते.
