गुरुतत्वाप्रमाणे शिष्यतत्वही अत्यंत प्रभावी असणे गरजेचे – डॉ. अ. ल. देशमुख
पुणे : प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात गुरूंविषयी श्रद्धा, सद््भावना, सद््विचार आणि चांगल्या कल्पना रुजणे गरजेचे आहे. गुरुपौर्णिमा हा आजचा सण नाही. जगाला ज्यांनी तत्वज्ञान सांगितले, त्या व्यासांची आठवण करण्याचा दिवस आहे. आज गुरुतत्व अबाधित असले, तरी देखील शिष्य त्याप्रमाणे वागताना दिसत नाहीत. त्यामुळे आजच्या काळात गुरुत्वाप्रमाणे शिष्यतत्वही अत्यंत प्रभावी असणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ.अ.ल.देशमुख यांनी व्यक्त केले.
न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूस् च्या जय गणेश कॉलेज आॅफ एज्युकेशन (बी.एड.) तर्फे संस्थेच्या शैक्षणिक संकुल १ मध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ.अ.ल.देशमुख यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सोनू नानगुडे, पॅराडाईज इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका संगिता बेन, नर्सिंग कॉलेजच्या अनुश्री पारधी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. संस्थेचे उपाध्यक्ष अॅड.शार्दुल जाधवर यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ.अ.ल.देशमुख म्हणाले, आई-वडील हे आपले पहिले गुरु आहेत. त्यानंतर आचार्य हे आपले गुरु असतात. शिक्षणातील पहिला महत्वाचा भाग हा उत्तम वागणूक असा आहे. शाळांमधून हे विचार संक्रमित करण्याचे दिवस आहेत. भाषा व विषय उत्तम प्रकारे यावे, जसा हा विचार आपण करतो. त्याप्रमाणे प्रत्येक शिक्षकांमधील उत्तम गुण विद्यार्थ्यामध्ये यावा, याकरिता प्रयत्न करायला हवे.
ते पुढे म्हणाले, शिक्षकाप्रमाणेच ग्रंथ हे देखील गुरु आहेत. व्यक्तिमत्व प्रगल्भ करण्याकरिता वाचनाशिवाय पर्याय नाही. तंत्रज्ञान आले असले, तरी वाचनाने मन व ह्रदयाची प्रगती होईल. वैचारिक उंची वाढविण्यासाठी शिक्षण आहे, त्यामुळे ग्रंथ हे आपण गुरु करायला हवे. पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त अवांतर वाचन अत्यंत महत्वाचे आहे. गुरुची व्याप्ती हा विषय आता केवळ शिक्षकांपुरतामर्यादित नाही. एखाद्याला ग्रंथ, एखाद्याला निसर्ग हा देखील गुरु वाटू शकतो, असेही त्यांनी सांगितले.
