भारतीय संस्कृती परिवर्तनशील ; इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांचे प्रतिपादन
पुणे : आपल्या संस्कृतीत जेव्हा जेव्हा विचारांना, तत्त्वांना ग्लानी आली, तेव्हा तेव्हा याच संस्कृतीत महान विचारवंत निर्माण होत गेले. या विचारवंतांनी त्या वेळी नवा संदेश दिला आणि समाजानेही तो स्वीकारला. गौतम बुद्ध, भगवान महावीर ही यांतीलच उदाहरणे आहेत. त्यामुळे प्राचीन भारतीय संस्कृती टिकण्यामागे तिचे परिवर्तनशील असणे हे मूळ कारण आहे, असे प्रतिपादन इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी केले.
डॉ लीना मेहेंदळे या भारतीय संस्कृती आणि तत्वज्ञानाच्या गाढ्या अभ्यासक असून भारतीय तत्त्वज्ञानाचा गाभा काय आहे, याचे सुंदर विचारमंथन त्यांनी या ग्रंथात केले असल्याचे पांडुरंग बलकवडे म्हणाले.
जगभरातील इतर संस्कृती नष्ट झाल्या तरी, आपली प्राचीन भारतीय संस्कृती ही अद्याप टिकली आहे. भारतीय संस्कृती टिकली तरच आपण टिकू असे जग म्हणत असले तरी, त्यांची मानसिकता आणि कृती ही भारतीय संस्कृती मिटविण्याचीच राहिली आहे. त्यामुळे आपली प्राचीन भारतीय संस्कृती पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी भारतीयांनीच प्रयत्नशील रहायला हवे. हे करीत असताना आपली संस्कृती आपण पुढे कशी पोहोचविणार आहोत यावर विचार करण्याची गरज आहे, असे डॉ लीना मेहेंदळे यांनी नमूद केले.
आपली संस्कृती काय आहे, याची ओळख भारतभर न्यायची असेल तर हिंदीमध्ये लिखाण करण्याची गरज डॉ मेहेंदळे यांनी अधोरेखित केली. महाभारत आणि ज्ञानेश्वरी यांचा गाभा ही भगवतगीता आहे. ज्ञानेश्वरी महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतभर आणि जगभर जावी यासाठी आपण प्रयत्न करायला हवे आहेत, असेही त्या म्हणाल्या.
आपली ज्ञानेश्वरी देशात सर्वदूर पोहोचविण्यासाठी हिंदी ही भाषा एक मुख्य माध्यम असल्याने प्रतिष्ठानच्या माध्यमातून ज्ञानेश्वरीचे हिंदी भाषांतर आपण देशभर पोहोचविण्यासाठी कार्यरत असल्याची माहिती डॉ अशोक कामत यांनी दिली.
पुस्तकाच्या प्रकाशनानंतर डॉ मेहेंदळे यांनी ‘महाभारत, ज्ञानेश्वरी व गीता’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. गुरुकुल प्रतिष्ठानच्या वतीने श्रेणिक शहा व लतिका शहा या दाम्पत्याचा आदर्श माता पिता पुरस्कार प्रदान करीत सन्मान करण्यात आला.
पुस्तकाचे सहलेखक योगेश्वर कस्तुरे यांनी सुरुवातीला पुस्तकामागील भूमिका स्पष्ट केली. शुभदा वर्तक यांनी सूत्रसंचालन केले.
