………त्यामुळे या निवडणुकीत मोदींची गॅरंटी चालली नाही – शरद पवार
मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने स्पष्टपणे महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला आहे. विधानसभा निवडणुकीत हा कौल कायम राखत जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे ही आमची जबाबदारी आहे आणि आम्ही ती निश्चितपणे पार पाडू, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी व्यक्त केला..
विधानसभेच्या 155 पेक्षा अधिक जागांवर विजय शक्य
या लोकसभा निवडणुकीत राज्यातील 48 जागांपैकी 30 ते 30 जागांवर आम्ही विजय मिळवला. या जागांचा विधानसभा मतदार संघाच्या दृष्टीने विचार केला तर निश्चितपणे 155 हुन अधिक विधानसभा मतदारसंघात आम्ही विजय मिळवू. महाराष्ट्रातील जनतेने असा कल व्यक्त केला आहे. जनतेच्या या अपेक्षा पूर्ण करून, विधानसभेच्या 155 हुन अधिक जागा हस्तगत करून राज्यात बहुमताचे सरकार स्थापन करणे ही आता आमची जबाबदारी आहे,
मोदींची गॅरंटी चालली नाही
मागच्या दहा वर्षात मोदी सरकारने जनतेला अनेक आश्वासने दिली. मात्र, ती प्रत्यक्षात आली नाहीत हे जनतेच्या लक्षात आले. त्यामुळे या निवडणुकीत मोदींची गॅरंटी चालली नाही. महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात भारतीय जनता पक्षाच्या विरोधात वातावरण आहे, हे लोकसभा निवडणुकीच्या निकालाने स्पष्ट झाले आहे. भारतीय जनता पक्षाला केंद्रात स्वतःच्या बळावर सरकार स्थापन करता आले नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन करावे लागले. भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ही भाजपचे कान टोचले आहेत. जनतेचा आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर विश्वास उरलेला नाही, हे या लोकसभा निवडणुकीने दाखवून दिले आहे, असेही पवार म्हणाले.
भुजबळ यांच्याशी संपर्क नाही
‘आपण दादांबरोबर नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आहोत,’ असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यातील मंत्री छगन भुजबळ यांनी नुकतेच केले आहे. या विधानावरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्क काढले जात असून भुजबळांच्या घरवापसीच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना पवार म्हणाले की, भुजबळ यांच्या या विधानाची पार्श्वभूमी आपल्याला माहित नाही. भुजबळ यांच्याशी सुमारे वर्षभरात आपला कोणताही संपर्क नाही. त्याचप्रमाणे भुजबळ यांच्याकडूनही आपल्याशी संपर्क साधण्याचे कोणतेही प्रयत्न सुरू नाहीत.
