Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

मंदिर तोडल्यामुळे देवतेचे अस्तित्व संपत नाही – विष्णू जैन

पुणे : एकदा एखाद्या ठिकाणी मंदिराची निर्मिती झाली तर काळाच्या शेवटपर्यंत तिथे मंदिराचेच अस्तित्व असते. तिथे देवता अप्रत्यक्षपणे विराजमान असतात. शिवलिंग किंवा मंदिर तोडल्यामुळे देवतेचे अस्तित्व संपत नाही. सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराच्या केस मध्ये हिंदू देवतेला जिवंत मानून आपला न्याय दिला आहे. आपल्या अप्रत्यक्ष देवतेला स्थापन करण्यासाठी आपण पुढाकार घ्यायला पाहिजे, असे मत काशी- -अयोध्या -मथुरेसाठी न्यायालयीन लढाई लढणारे सुप्रसिद्ध वकील विष्णू जैन यांनी व्यक्त केले.

हिंदू हितासाठी कार्य करणाऱ्या देशभरातील कार्यकर्त्यांना अक्षय्य हिंदू पुरस्कार समिती तर्फे ‘अक्षय्य हिंदू पुरस्काराने’ गौरविण्यात आले. स. प. महाविद्यालयातील लेडी रमाबाई हॉल येथे कार्यक्रम झाला. यावेळी माजी खासदार प्रदीप रावत, समितीचे तुषार दामगुडे, शेफाली वैद्य, सौरभ वीरकर, स्नेहल कुलकर्णी, रिषभ परदेशी, कल्याणी रणसिंग, अमोल शुक्ला, श्रीनिवास निगडे, सारिका वाघ, महेश पवळे, रुपेश कुलकर्णी, शिवानी गोखले उपस्थित होते.

मुख्य पुरस्कार ऋषिकेश सकनूर यांना हिंदू एकतेच्या कार्याकरिता, प्रभाकर सूर्यवंशी यांना व्याख्याते म्हणून, गुड्डी शिलू यांना जनजाती कल्याण कार्याकरिता आणि आचार्य के. आर. मनोज यांना धर्म जागरण करिता देण्यात आला. तसेच कै. शरद मोहोळ यांना मरणोत्तर विशेष पुरस्कार स्वाती मोहोळ यांनी स्वीकारला आणि अनंत करमुसे यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोदंडदारी श्रीरामाची अन्यायाविरुद्ध लढायला प्रवृत्त करणारी वीरश्रीयुक्त मूर्ती, दहा हजार रुपये रोख आणि पुस्तकांचा संच असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्कार वितरण सोहळ्याचे यंदा दुसरे वर्ष आहे. गडचिरोली भागात वनवासी जनजातींसाठी कार्य करीत असलेले सामाजिक कार्यकर्ते दत्ता शिर्के यांना ‘सांगाती ट्रस्ट’ तर्फे डॉ. सुजित निलेगावकर एक रुग्णवाहिका यावेळी प्रदान करण्यात आली.

ॲड. विष्णू जैन म्हणाले,२२ जानेवारी २०२४ हा सनातनींसाठी अभूतपूर्व दिवस होता. या दिवशी आपले आराध्य रामलल्ला यांची प्रतिष्ठापना करण्यात आली. राम मंदिर हे आस्थेच्या आधारावर मिळाले नाही तर तिथे अनेक ऐतिहासिक पुरावे मिळाले आहेत त्या आधारावर मंदिर निर्मितीसाठी न्याय मिळाला आहे. मंदिर तोडून दिल्यामुळे देवतेचे अस्तित्व संपत नाही.

राम मंदिराच्या लढाईच्या वेळी शपथ घेण्यात येत होती की मंदिर वही बनायेंगे हे वचन होते ते आपल्या भक्ताचे देवाप्रती. अशाच प्रकारे मथुरा आणि ज्ञानव्यापी यांच्यासह देशातील अनेक मंदिरासाठींची लढाई बाकी आहे.

अनंत करमुसे म्हणाले, संयम,संविधान आणि सावधगिरी हे जर तुम्ही सांभाळले तर लढण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. आपली माती आपला धर्म आपल्याला लढायला शिकवतो. त्यामुळे त्यावरचे प्रेम कमी होता कामा नये.

आचार्य के. आर. मनोज म्हणाले, प्रलोभन व बुद्धिभेद करून इस्लाम व ख्रिश्चन पंथात धर्मांतर केलेल्या हिंदूंची घरवापसी करणे हे माझे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. स्वाती मोहोळ म्हणाल्या, शरद मोहोळ यांचे हिंदुत्वाचे जे काम अपूर्ण राहिले आहे, ते मी पुढे घेऊन जाणार आहे. शेफाली वैद्य यांनी पुरस्कारार्थींची मुलाखत घेतली. सौरभ वीरकर यांनी प्रास्ताविक केले. निवेदिता एकबोटे यांनी सूत्रसंचालन केले.

ज्ञानवापी केस मध्ये जिंकण्याच्या उंबरठ्यावर
सगळे पुरावे गोळा करून जुलैमध्ये जेव्हा न्यायालयात ट्रायल असेल सहा महिन्यातच या केसची ट्रायल संपवण्याचा आमचा प्रयत्न असेल. २२ जानेवारी २०२४ सारखा सुवर्ण क्षण आपल्याला पुन्हा एकदा ज्ञानव्यापीच्या निमित्ताने अनुभवता येईल. आणि कायदेशीर पूजा तेथे करता येईल. ही भारतीय न्यायव्यवस्थेची ताकद आहे. मधुरा श्रीकृष्ण जन्मभूमीची केस सुद्धा जलद गतीने चालू आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading