Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

माझ्याकडून संस्कृत आणि धार्मिक गायन झाले याचे मनस्वी समाधान

प्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांचे प्रतिपादन

पुण४ : जन्म मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याने घरात धार्मिक वातावरण होतेच. वडिलांनी लहानपणापासून सूत्रे, रामरक्षा पाठ करून घेतल्याने उच्चार स्वच्छ आणि स्पष्ट  झाले. पुढील काळात सुहासिनी मूळगावकर यांनी संस्कृत उच्चार कसे असावेत, संस्कृतमध्ये कसे गावे हे शिकवले. अनेक संस्कृत आणि धार्मिक गाणी ही यामुळेच होऊ शकली. मागे वळून पाहताना संपूर्ण कारकिर्दीत माझ्याकडून संस्कृत आणि आध्यात्मिक गायन झाले याचे आज मनस्वी समाधान मला आहे, अशा भावना सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांनी व्यक्त केल्या. लोकप्रिय भावगीत गायक स्व. अरुण दाते यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणारा अरुण दाते कला सन्मान पुरस्कार यावर्षी गायक रवींद्र साठे यांना प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

स्व. अरुण दाते यांच्या ९० व्या जयंतीचे औचित्य साधत रामुभैय्या दाते स्मृती समिती व अतुल अष्टेकर यांच्या संयुक्त विद्यमाने कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे संपन्न झालेल्या ‘शुक्रतारा’ या सांगीतिक कार्यक्रमात सदर पुरस्कार राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी व कृष्णा राजाराम अष्टेकर यांच्या हस्ते साठे यांना प्रदान करण्यात आला.

प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले, स्व. अरुण दाते यांचे सुपुत्र अतुल दाते, अतुल अष्टेकर, कृष्णा राजाराम अष्टेकर, अतुल अष्टेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. अरुण दाते कला सन्मान पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असून शाल श्रीफळ भेटवस्तू मानचिन्ह, मानपत्र
असे याचे स्वरूप होते.

रामुभैया दाते, अरुण दाते यांसोबतच अनेक मोठ्या कलाकारांकडून अनेक गोष्टी शिकता आल्या. संस्कृत आणि धार्मिक गायन करताना कुटुंबीयांची खूप मदत झाली शिवाय आजूबाजूचे वातावरण ही यासाठी पूरक ठरले अशा आठवणी यावेळी साठे यांनी सांगितल्या. आज अरुण दाते यांच्या नावाने देण्यात येणारा सन्मान मला प्रदान करण्यात येत आहे याचे समाधान असल्याचेही साठे यांनी नमूद केले.

आयुष्यात वेगवेगळी गाणी आपल्याला खूप देतात. या गाण्यावर जणू आपला जीव पोसला जातो असे मला वाटते असे सांगत मेधा कुलकर्णी म्हणाल्या, जसा अन्नमय कोष असतो तसा मनोन्मय कोषही असावा आणि तो अशा संगीतावर पोसला जातो. त्यामुळे कलाकार हा माझ्यासाठी कायमच तीर्थक्षेत्राप्रमाणे आहे.

कलाकार आसपास असणे हे मानसिक समाधान आहे पुणेकरांना ते कायम मिळत असते. खरेतर हे आपल्या सर्वांचेच भाग्य आहे असे कृष्णा राजाराम अष्टेकर यांनी सांगितले.

या नंतर स्व अरुण दाते यांच्या लोकप्रिय गीतांचा कार्यक्रम असलेला ‘शुक्रतारा’ हा कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये सुप्रसिद्ध गायक व संगीतकार मंदार आपटे, गायक श्रीरंग भावे, गायिका पल्लवी पारगावकर, वर्षा जोशी यांनी अरुण दाते यांची गाणी सादर केली. तर अतुल अरुण दाते यांनी आठवणी, किस्से सांगत कार्यक्रमाची लज्जत आणखी वाढविली.

यावेळी सादर झालेल्या स्वरगंगेच्या काठावरती… , मालवून टाक दीप…, माझिया मना…, डोळे कशासाठी…, भेट तुझी माझी…, भातुकलीच्या खेळामधले… या गीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. 

यावेळी अमित कुंटे, अमेय ठाकूरदेसाई
(तबला व ढोलक), अभय इंगळे (ऑक्टोपॅड), प्रसन्न बाम (संवादिनी), झंकार कानडे व केदार परांजपे की बोर्ड यांनी साथसंगत केली.

प्रियांका जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. — 
     

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading