Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

आपल्याला केवळ त्यांचा मुलगा नसल्याने संधी मिळाली नाही – अजित पवारांनी व्यक्त केली खंत

पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे.  प्रचारानिमित्त आयोजित सभेत बोलताना अजित पवार यांनी पुन्हा एकदा आपल्या  मनातली खदखद व्यक्त केली. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आपल्याला केवळ त्यांचा मुलगा नसल्याने संधी मिळाली नाही अशी खंत व्यक्त करत पवारसाहेब माझे दैवत आहेत यात दुमत नाही. पण ८० वर्षे झाल्यानंतर तरी थांबायला हवं. नव्या लोकांना संधी द्यायला पाहिजे असही अजित पवार म्हणाले.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, मी साहेबांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती. मुलगा नाही म्हणून संधी नाही, हा कसला न्याय? असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी सक्रीय होण्याआधी साहेबांकडे जिल्हा बँक नव्हती. मी राजकारणात आल्यापासून जिल्हा बँक राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. आता दिगंबर दुर्गाडे चेअरमन आहे. जिल्हा परिषद ताब्यात आहे. पिंपरी चिंचवड ताब्यात नव्हती, १९९२ पासून २०१७ पर्यंत ताब्यात ठेवलं आणि चांगलं शहर केलं. बारामती कशा पद्धतीने बदलली एकदा येऊन बघा. अनेक लोकं आम्हाला सांगतात आम्हाला निवडून द्या आम्ही बारामतीसारखा विकास करू. कायतरी केलंय ना? की तिथं गोट्या खेळलो का? कामच केलंय ना? अशा शब्दात अजित पवार यांनी आरोप करणाऱ्यांना उत्तर दिलं.

महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या  आरोपांनाही अजित पवार यांनी उत्तर दिलं. शिरुरच्या सभेत बरळले अनेकजण, अजित पवारांनी कारखाना बंद पाडला. अजित पवार संचालक नाही की काही नाही, मग अजित पवारांनी कसा बंद पाडला, संचालकांनी कर्ज काढलं, कर्जबाजारी केला त्यांनी आणि माझ्या नावावर पावती फाडता, सोमेश्वर, माळेगावचा भाव जास्त आहे. अशाच संस्था चालवत नाही. काहीतरी सांगून लोकांची दिशाभूल  कोल्हे करतायत असेही पवार म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading