बँडच्या गजरात भाचे मंडळींचे मामाच्या गावी जंगी स्वागत
शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने विविध संस्थांमधील वंचित विशेष मुलांसाठी मामाच्या गावची सफर हा अनोखा उपक्रम राबविला जात आहे. उपक्रमाच्या पहिल्या दिवशी पद्मभूषण प्राप्त दिग्दर्शक राजदत्त, शि.प्र. मंडळीचे सुधीर काळकर यांनी मुलांचे स्वागत केले. कीर्तनकार चारुदत्त आफळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, भक्ती मायाळू, पराग ठाकूर, हेमंत मावळे, डाॅ. मिलिंद भोई, शिरीष मोहिते, अध्यक्ष गणेश सांगळे, अमर लांडे, सचिन ससाणे, विक्रांत मोहिते, उमेश कांबळे, मित नानावटी, नमन कांबळे, यश सावंत, साहिल आंबेडकर, स्वाती महाले, माधवी महाले, दर्शनी ससाणे, पराग शिंदे यावेळी उपस्थित होते. शुक्रवार पेठेत सेवा मित्र मंडळ चौकात दि. ७ ते १२ मे पर्यंत हा उपक्रम होणार आहे.
भाचे मंडळींच्या जंगी स्वागतानंतर नाच रे मोरा… झिंगाट च्या तालावर मुले मनसोक्त नाचली. उंट आणि घोड्यावरून तसेच बग्गीतून रपेट मारत चॉकलेट खाण्याचा आनंदही त्यांनी लुटला. मनसोक्त हसणारी, दंगा करणारी मुले पाहणे हा उपस्थितांसाठी देखील आनंदाचा क्षण होता.
राजदत्त म्हणाले, मामाच्या गावची सफर या उपक्रमाच्या निमित्ताने अकल्पीत आनंद मिळाला आहे. मागील २५ वर्षांपासून सातत्याने हा उपक्रम राबविला जात आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. समाजाच्या, माणसाच्या जीवनातील दुःख कमी करण्याचा हा प्रयत्न आहे, ही गोष्ट साधी आहे तितकीच महत्त्वाची देखील आहे.
मामाच्या गावची सफर या उपक्रमासोबतच दृष्टीहिन असलेल्या जोडप्यांच्या विवाह सोहळ्याचे आयोजन देखील केले जाते. लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्था यांच्या समवेत या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. मामाच्या गावची सफर या उपक्रमाचे यंदा रौप्यमहोत्सवी (२५) वर्ष आहे.
विवाहपूर्व मेहंदीचा कार्यक्रम बुधवार, दि. ८ मे रोजी सायंकाळी ७ होणार आहे. रौप्यमहोत्सवानिमित्त स्मरणिका तयार करण्यात आली असून प्रकाशन बुधवारी सायंकाळी होणार आहे. तर, रविवार, दि. १२ मे रोजी साखरपुडा, हळदी समारंभ आणि त्यानंतर नवरदेवाची वरात दुपारी ४.३० वाजता व विवाहाचे धार्मिक विधी होणार आहेत. मुख्य विवाह सोहळा सायंकाळी ६ वाजता संपन्न होणार आहे. यावेळी सामाजिक, राजकीय व प्रशासकीय सेवेतील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
