शिरुर तालुक्यातील जनता माझी हक्काची जनता : शिवाजीराव आढळराव पाटील
शिरुर : महायुतीचे शिरुर लोकसभेचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी पंचायत समिती गणामध्ये गावभेट दौऱ्याचे आयोजन केले होते. यावेळी काठापुर,पिंपरखेड,चांडोह, फाकटे, जांबूत, शरदवाडी, वडनेर, माळवाडी, आमदाबाद अशा गावांत आढळराव पाटील यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टि करुन तसेच ढोल-ताश्या व फटाके फोडून जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना आढळराव पाटील म्हणाले की, “ही सर्वच गावे माझी हक्काची गावे आहेत. या ठिकाणच्या माझ्या लोकांनी मला कायमच साथ दिली आहे. त्यामुळे या परिसरातून आपण मला चांगले मताधिक्य द्याल, या बाबत माझ्या मनात किंचिंतही शंका नाही.”
काठापुर, पिंपरखेड,चांडोह, फाकटे, जांबूत, शरदवाडी, वडनेर, माळवाडी, आमदाबाद अशा सर्वच ठिकाणच्या ग्रामस्थांनी आढळराव दादांना मोठे मताधिक्य देण्याचा शब्द यावेळी दिला. ढोल-ताशांच्या गजरात शिवाजीदादा यांचे स्वागत करण्यात आले. महिला व तरुणींनी आढळराव पाटील यांचे औक्षण केले. युवक-युवतींनी शिवाजीदादा यांच्यावर पुष्पवृष्टि केली. यावेळी मोठ्या उत्साहात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी नागरिकांनी मोठ्या उत्साहात उमेदवार आढळराव पाटील यांचे जंगी स्वागत केले.
दरम्यान, यावेळी बोलताना आढळराव पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी मी कायमच कटीबद्ध असतो. माझ्याकडे आलेल्या प्रत्येकाचे काम करण्याचा प्रयत्न मी केला आहे. शिक्रापुर-अवसरी रस्ता माझ्या प्रयत्नातूनच झाला आहे.मंत्री दिलीपराव वळसे पाटील आजारी असले तरी त्यांचे सर्व मतदार संघातील बाबींवर बारकाईने लक्ष आहे. त्यामुळे आपण सर्वांनी पुढचे काही दिवस सक्रिय राहावे व आपले मताधिक्य जास्तीत-जास्त कसे वाढेल हे पाहावे. मी 15 वर्षे खासदार असताना व मागील 5 वर्षे खासदार नसताना देखील परिसरातील गावांना मोठा निधी मिळवून दिला आहे. मला तुमच्याकडे मते मागण्याचा अधिकार आहे. समोरचा विरोधी उमेदवार मागील 5 वर्षे खासदार असताना केव्हाही कुठल्याही गावात गेला नाही. कुठलीही विकासकामे केली नाहीत. त्यामुळे विचार करुन मतदान करा. आपल्या सर्व समस्या सोडविण्यासाठी मी कटीबद्ध आहे. समोरचा आपल्या विरोधातील उमेदवार विनाकारक आपल्याला बदनाम करत आहे. आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहे. कारण त्यांच्याकडे सांगण्यासारखे कुठलेही काम नाही, पाच वर्षांत ते मतदार संघात फिरकलेही नाहीत. यामुळे विनाकारण मला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरु आहे. पाणी, रस्ते, वीज हे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी फक्त भाषणे ठोकून चालणार नाही. त्यासाठी आपल्याला तुमच्या हक्काचा माणूस संसदेत पाठवणे गरजेचे आहे. आपल्या परिसरातील प्रश्न दिलीपराव वळसे पाटील, बापूसाहेब, अजित दादा व माझ्या माध्यमातून नक्की सोडविले जातील. त्यामुळे मला म्हणजेच घड्याळाला मत म्हणजेच मोदीजी यांना मत. येत्या १३ तारखेला सर्वांनी घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून मला भरघोस मतांनी विजयी करावे हीच विनंती करतो.”
यावेळी बोलताना माजी आमदार पोपटराव गावडे म्हणाले, “आढळराव पाटील यांना या भागातून मोठे मताधिक्य देण्याचा प्रयत्न करणार आहोत. ते आपले सर्व प्रश्न मार्गी लावतील असा मला विश्वास आहे. आपल्या भागातील प्रश्नांबाबत आढळराव पाटील हे संसदेत आवाज उठवतील व आपल्या समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करतील. मोदीजी यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला शिवाजीराव आढळराव पाटील यांना निवडून देणे आवश्यक आहे. येत्या १३ तारखेला सर्वांनी घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना भरघोस मतांनी विजयी करावे. तसेच येत्या 8 तारखेला होणाऱ्या अजित पवार यांच्य सभेला आपण मोठ्या प्रमाणावर उपस्थित रहावे.”
