Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

पारंपरिक पालखी रथसोहळा व मिरवणुकीद्वारे पूर्व भागात शिवरायांना नमन

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांची रथावर विराजमान झालेली सिंहासनाधिष्ठीत मूर्ती… शिवछत्रपतींची प्रतिमा पालखी रथात ठेऊन केलेले पूजन…रांगोळीच्या पायघड्या व फुलांची उधळण…पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिला… ढोल-ताशांचा गजर व शंख निनाद आणि मर्दानी खेळांचे सादरीकरण… अशा शिवमय झालेल्या वातावरणात शहराच्या पूर्व भागातील सर्वात मोठा शिवजयंती सोहळा उत्साहात पार पडला. गुरुवार पेठेतील प्रभात मित्र मंडळातर्फे आयोजित शिवजयंती उत्सवात पारंपरिक पालखी सोहळा हे यंदाचे मुख्य आकर्षण ठरले.

यावेळी श्री धाम वृंदावन येथील अखिल भारतीय साध्वी शक्ती परिषदेच्या केंद्रीय महामंत्री पू.साध्वी प्रज्ञा भारती, रा.स्व. संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक सुरेश उर्फ नानासाहेब जाधव, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, मंडळाचे अध्यक्ष किशोर चव्हाण, सचिव उदय वाडेकर, रवींद्र भन्साळी, संदीप नाकील, मंगेश शिंदे, उत्सव प्रमुख शिवराज बलकवडे, विजय चौधरी, ओंकार नाईक, हेमराज साळुंखे, सचिन भोसले, निलेश कांबळे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. शिवजयंती उत्सवाचे यंदा ४० वे वर्ष आहे.

पू.साध्वी प्रज्ञा भारती म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला, तेव्हा सनातन चा संस्कार संकटात होता. सनातन संस्कृतीच्या रक्षणार्थ त्यांनी पाऊल उचलले. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे देखील संरक्षण केले. लहानपणापासून मिळालेल्या संस्कारांनी शिवरायांना घडविले.

नानासाहेब जाधव म्हणाले, राष्ट्रभक्ती, देशप्रेम छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेत निर्माण केले. शिवजयंती साजरी करताना आपल्या देखील काही जबाबदाऱ्या आहेत. आजही देशाचे तुकडे व्हावे, असा विचार करणारे काही जण आहेत. त्यांना तोंड देण्यासाठी आपण सिद्ध राहायला हवे.

सुरुवातीला शिवप्रतिमेचे पूजन पू.साध्वी प्रज्ञा भारती यांच्या हस्ते झाले. त्यानंतर फुलांची उधळण करीत स्थानिक महिला व कार्यकर्त्यांनी मिरवणुकीचेस्वागत केले. यावेळी विनोद आढाव यांच्या कसबा पेठेतील त्र्यंबकेश्वर मर्दानी आखाडा मधील कलाकारांनी सादर केलेले मर्दानी खेळ पाहण्याकरीता पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती. तसेच केशव शंखनाद पथक, श्री गजलक्ष्मी ढोल-ताशा पथक व सोलापूर टेंभूर्णी येथील ओम श्री हलगी पथकाच्या तालावर उपस्थितांनी ठेका धरला. यावेळी वेडात दौडले वीर मराठे सात या स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या बलिदानावर आधारित जीवंत देखावा देखील सादर करण्यात आला.

किशोर चव्हाण म्हणाले, सार्वजनिक स्वरुपात शिवजयंती उत्साहात साजरी व्हायलाच हवी. मात्र, घराघरात शिवजयंती साजरी व्हावी, याकरीता मंडळ प्रयत्न करीत आहे. प्रत्यक्ष शिवजयंतीच्या दिवशी पारंपारिक पध्दतीने शिवजयंती साजरी होईल व घरोघरी शिवचरित्राचे वाचन होईल यासाठी मंडळाच्या माध्यमातून जागृती करण्यात येत आहे. याशिवाय परिसरातील नागरिकांकरिता विविध स्पर्धांसारखे उपक्रम देखील राबविण्यात आले आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading