तंत्रज्ञानासोबतच जनसंपर्क जीईएम ला सशक्त करेल – किरण बेदी
पुणे : शासनामधील सगळे विभाग एकसारखे नसतात. अनेक ठिकाणी भ्रष्टाचार देखील मोठया प्रमाणात होतो. त्यामुळे नागरिक व ग्राहकांशी थेट संपर्क होण्याकरिता कॉल सेंटर असणे गरजेचे आहे. तसेच त्या कॉल सेंटरच्या क्रमांकाची प्रसिद्धी होणे गरजेचे आहे. अनेकांकडे नवनवीन कल्पना असतात, त्या यामाध्यमातून पोहोचायला हव्यात. तंत्रज्ञानासोबतच जनसंपर्क व सहभाग सरकारी ई बाजारपेठेच्या (जीईएम) संकल्पनेला सशक्त करेल, असा विश्वास पॉंडिचेरी च्या माजी राज्यपाल किरण बेदी यांनी व्यक्त केला.
आनंद इन्फोसिस्टिमतर्फे सरकारी ई बाजारपेठ (जीईएम) समिट २.० अंतर्गत एक प्रयास – आत्मनिर्भर भारत की और याविषयावरील संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन बावधन येथील मॅरिगोल्ड बॅन्क्वेटस् येथे करण्यात आले होते. यावेळी सरकारी ई बाजारपेठ (जीईएम) चे प्रशिक्षण विभाग मुख्य व्यवस्थापक प्रणित कुमार सिंग, आर अॅड. डीई पुणे च्या विमला सोलंकी, एचईएमआरएल चे ज्येष्ठ शास्त्रज्ञ एनपीएन राव, आनंद इन्फोसिस्टिमचे संचालक प्रितम भटेवरा आदी उपस्थित होते. कलाकार पद्माकर गुजर व सहका-यांचा वाद्य जुगलबंदीचा कार्यक्रम यावेळी पार पडला. बोरोसिल आणि डिजिसोल यांनी या उपक्रमाला विशेष सहकार्य केले.
त्या पुढे म्हणाल्या, जीईएम चे यू ट्यूब चॅनेल अधिकाधिक समृद्ध करुन रेडिओ च्या माध्यमातून देखील नागरिकांपर्यंत पोहोचायला हवे. कोणतीही सरकारी योजना केल्यानंतर ती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली की नाही, हे पाहणे गरजेचे असते. नाहीतर्, आपले काम अपूर्ण राहते. आज तंत्रज्ञान खूप मोठया प्रमाणात विकसित झाले आहे. मात्र, त्याचा योग्य प्रकारे वापर करणे आवश्यक आहे.
प्रितम भटेवरा म्हणाले, जीईएम चे व्यासपीठ स्टार्टअपना नियमित विक्रेत्यांसाठी उपलब्ध असलेल्या सर्व बाजारपेठीय कार्यक्षमता देऊ करते आणि इंडिया स्टार्टअपमधून मेक इन इंडिया खरेदीला उत्तेजन देणे, हा यामागील उद्देश आहे. ख-या अर्थाने मेड इन इंडियाच्या संकल्पनेतून नवनवीन उद्योजकांना प्रोत्साहन दिले जात आहे. अशा जीईएम च्या संकल्पनेला सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि जीईएम च्या अधिका-यांशी थेट संवाद व्हावा, या उद्देशाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
