देशातील कुटुंबव्यवस्था महिलांमुळे भक्कमपणे टिकून आहे – माधुरी सहस्रबुद्धे.
पुणे:- आपल्याकडील कुटुंबव्यवस्था ही एक शैक्षणिक संस्थाच आहे. ती टिकून राहण्यासाठी घरातील महिला कुटुंबाचा आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असते. तिला अबला कसे म्हणता येईल? परंतू तिच्यावरील अन्याय-अत्याचाराविरोधात समाजाने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, अशी अपेक्षा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व फौंडेशन फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट संस्थेच्या अध्यक्षा माधुरी सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केली.
जागतिक महिला दिनानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन व ढोले एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या मातृ शक्तीचा जागर या विषयावरील जाहीर व्याख्यानात त्या बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ.पराग काळकर, व्यवस्थापन परिषद सदस्य रविंद्र शिंगणापूरकर, ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सागर ढोले पाटील, सचिव सौ.उमा ढोले पाटील तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख डॉ.सुनील भंडगे उपस्थित होते.
‘मदर आॅन व्हील्स’ या उपक्रमांतर्गत माधुरी सहस्रबुद्धे, ऊर्मिला जोशी व शीतल देशपांडे या तिघींनी चारचाकीने २२ देशांचा २३६५४ किलोमीटरचा, दिल्ली ते लंडन असा प्रवास ६०दिवसांत पूर्ण केला. सौ.सहस्त्रबुध्दे पुढे म्हणाल्या, वसुधैव कुटुंबकम् च्या भूमिकेतून त्या देशांतील कुटुंब व्यवस्था आणि मातांची भूमिका काय आहे? या उत्सुकतेपोटी प्रवास करताना भारताव्यतिरिक्त अन्य देशांतील भयानकता समोर आली. घटस्फोट, लिव्ह इन रिलेशनशिप, एकल पालकत्व, व्यसनाधिनता इ. मुळे कुटुंब व्यवस्था संपुष्टात येत असल्याचे जाणवले. आमच्या कपाळावर कुंकू आणि गळ्यात असलेलं मंगळसूत्र इ.मुळे खूप ठिकाणी स्वागत झाल्याचे सौ.सहस्रबुध्दे यांनी सांगितले.
प्र-कुलगुरू डॉ.पराग काळकर यांचेही भाषण झाले, ते म्हणाले, *’सावित्रीबाई फुले यांच्या नावाने असलेल्या विद्यापीठात आम्ही काम करतो, हे आमचे भाग्य आहे. त्यांचाच आदर्श घेऊन आज समाजाच्या सर्वच क्षेत्रात महिलांची लक्षणीय घोडदौड स्तिमित करणारी आहे. कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीसाठी महिलांचे अनन्यसाधारण योगदान आहे. त्यांचा नेहमीचा सन्मान करायला हवा.’ अध्यक्षीय समारोप करताना सचिव सौ.उमा ढोले पाटील म्हणाल्या, *’प्रत्येक मिळालेल्या संधीचे सोने करण्याची क्षमता महिलांमध्ये आहे. राष्ट्रपती पदापासून ते शिक्षिकेपर्यंतची कर्तबगारी महिलांमध्ये आहे. परंतू त्यांच्यावरील अन्यायाच्या घटना थांबायला पाहिजे’.
यावेळी सौ.माधुरी सहस्रबुद्धे आणि सौ. उमा सागर ढोले पाटील यांचा सावित्रीबाई फुले यांचा पुतळा व शाल-श्रीफळ देऊन डॉ.पराग काळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यासन प्रमुख डॉ.सुनील भंडगे यांनी केले, आभार प्रदर्शन सागर ढोले पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.वैदेही हिरेमठ यांनी केले. कार्यक्रमाला डॉ.श्यामा घोणसे, लता हिरेमठ, अनुराधा अय्यर, राधिका शिंगणापूरकर तसेच ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीतील प्राचार्य, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
