रवींद्र वायकर यांनी सोडली ठाकरेंची साथ
मुंबई : सत्तेत असल्याशिवाय मतदारसंघातील काम होत नाहीत. मतदारसंघातील मतदरांना सत्तेत असल्यावरच न्याय देता येतो, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रवींद्र वायकर यांच्या पक्षप्रवेशावेळी केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार रवींद्र वायकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला.
“रवींद्र वायकर यांनी आज बाळासाहेबांच्या विचारांच्या खऱ्या शिवसेनेत प्रवेश केला. वायकरांचे आमच्या पक्षात स्वागत करतो. गेली 40 ते 50 वर्ष बाळासाहेबांसोबत त्यांनी शिवसेनेचे काम केले. बाळासाहेबांचे विचार संपूर्ण राज्यभरात पोहोचवण्याचे काम आम्ही केले. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हा बाळासाहेबांनी दिलेल्या मंत्राचा आम्ही पालन करत आलो. रवींद्र वायकर यांनी सहकुटुंब शिवसेनेत प्रवेश केला आहे. वायकर यांनी आपल्या मतदारसंघातील प्रश्न सांगितले”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
“या देशाला पूर्ण जगभरात उच्च स्थानावर नेण्यासाठी आणि या देशाचे नाव जगभरात जे सन्मानानी घेतले जाते ते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्तृत्वामुळे घेतलं जाते. देशाच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयांच्या आणि राज्यातील विकासासाठी महायुतीच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांचा सकारात्मक परिणाम रवींद्र वायकर यांच्यावर झाला आहे. त्यामुळे सकारात्मक दृष्टीकोन ठेवून, विश्वास ठेवून आणि मतदारसंघातील मतदारांचे प्रश्न सोडवण्यासाठी रवींद्र वायकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे”, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
“मुंबईकरांना न्याय देण्यासाठी आम्ही सरकार म्हणून काम करत आहोत. तसेच, माझे आणि वायकरांचे गैरसमज आणि संभ्रम होता तो आता दुर झाला आहे. आमच्यात तिसरा माणूस संभ्रम निर्माण करत होता. हा एकनाथ शिंदे सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे दिलेला शब्द मी नेहमीच पाळतो. तसेच, धनुष्यबाण हे मागील 50 वर्षांपासून आहेत. बाळासाहेबांची शिवसेना पहिल्यापासून आहे. त्यामुळे भरकटवण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे”, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
“अडीच वर्षांच्या सत्तेत त्यांच्या मतदारसंघातील कामं झाली असती तर, ते आता इथे आले नसते. पण मतदारसंघातील कामं करण्यासाठी ते इकडे आले आहेत. याच कारणामुळे अनेक जण शिवसेनेत प्रवेश करत आहेत. कारण सत्तेत आल्यावरच काम होतात”, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीवर टीका केली.
