कलम आणि कवच – प्राचीन ज्ञान आणि आधुनिक सुरक्षा यांचा संगम
पुणे : पेंटागन प्रेस आणि सदर्न कमांड यांच्या सहकार्याने आरएसआय संस्थेत “कलम आणि कवच” या अभिनव रक्षा साहित्य महोत्सवाचे यशस्वी आयोजन केले. सन्माननीय मुख्य अतिथी जनरल अनिल चौहान, सीडीएस यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले, ज्यामुळे भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि आधुनिक राष्ट्रीय सुरक्षा यांचे समन्वय साधले गेले.
राष्ट्रीय सुरक्षेच्या बदलत्या परिस्थितीत भारताने त्याच्या प्राचीन ग्रंथांमधून प्रेरणा घेतली आहे. या कार्यक्रमात, महाभारत आणि भगवद्गीता सारख्या ग्रंथांमधील प्राचीन ज्ञान आजच्या रणनीतीक गरजांसाठी कसे महत्वपूर्ण आहे हे दाखवण्यात आले.
जनरल अनिल चौहान, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, यांनी भारतीय ग्रंथांतील धर्माचे शाश्वत महत्व अधोरेखित केले, त्याचे कर्तव्य, नीतिमत्ता आणि नैतिक संतुलनाचे तत्त्व उजागर केले. लेफ्ट. जनरल ए. के. सिंह, आर्मी कमांडर सदर्न कमांड यांनी या प्राचीन रणनीतींना आधुनिक धोक्यांना आणि आव्हानांना अनुकूल करण्याचे महत्व अधोरेखित केले.
जागतिक भूराजकीय स्थितीपासून राष्ट्रीय सुरक्षेतील आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या भूमिकेपर्यंत वैविध्यपूर्ण विषयांचा उहापोह करणाऱ्या चार महत्त्वाच्या पुस्तकांचे प्रकाशनही ह्या महोत्सवात झाले. अजय सिंग ह्यांचे ‘रशिया, गाझा, तैवान… अ वर्ल्ड अॅट वॉर’, कर्नल अमित सिन्हा व विजय खरे ह्यांचे ‘एआय अँड नॅशनल सिक्युरिटी तसेच तिलक देवाशेर ह्यांनी संपादित केलेले ‘पाकिस्तान इनसाइट्स ट्वेंटीट्वेंटीथ्री’ आणि कॅप्टन अलोक बन्सल ह्यांचे ‘ग्वादर’ ह्या पुस्तकांचे प्रकाशन महोत्सवात झाले.
पेंटागॉन प्रेसचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राजन आर्य ह्यांनी, कारगिल युद्धाला २५ वर्षे होत असल्याबद्दल चर्चा करताना, राष्ट्रीय सुरक्षेबाबतच्या जटीलतांबाबत जागरूकता निर्माण करण्याप्रती तसेच व्यूहरचनात्मक विचार संस्कृतीला प्रेरणा देण्याप्रती कंपनी मानत असलेल्या बांधिलकीवर प्रकाश टाकला.
‘आत्मनिर्भर भारत- पॉवरिंग इंडियाज डिफेन्स सेक्टर’ ह्या महत्त्वपूर्ण सत्रात श्री. बाबा कल्याणी ह्यांच्यासारख्या उद्योगक्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्वांनी सहभाग घेतला. संरक्षण क्षेत्रात खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण होण्यासाठी समन्वयात्मक प्रयत्न गरजेचे आहेत, ह्यावर सत्रात विशेष भर देण्यात आला.
पुण्यात प्रथमच होत असलेल्या ह्या महोत्सवाच्या निमित्ताने तज्ज्ञांनी एकत्र येऊन जागतिक संघर्षांपासून ते संरक्षणातील वारशाच्या भूमिकेपर्यंत विविध विषयांवर चर्चा केली. इतिहास, संस्कृती, संरक्षण आणि सुरक्षितता ह्या सर्वांना एकत्र आणून एका सूत्रात बांधण्याचे उद्दिष्ट ठेवणाऱ्या भविष्यकाळासाठी हा महोत्सव दीपस्तंभासारखा ठरला.
