Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

शेतकऱ्यांना गेल्या दिड वर्षात ४४ हजार कोटींची मदत- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

यवतमाळ  : आपला देश शेतीप्रधान देश आहे. शेतकऱ्यांच्या घरात समाधान फुलले पाहिजे, त्यांचे अरिष्ट दुर झाले पाहिजे, या भावनेने राज्यात आपण काम करतो आहे. त्यामुळेच गेल्या दिड वर्षात वेगवेगळ्या माध्यमातून आपण राज्यातील शेतकऱ्यांना 44 हजार कोटी रुपयांची मदत केली. शेतकऱ्यांना चांगली मदत करता यावी यासाठी प्रसंगी निकषाच्या बाहेर आपण निर्णय घेतले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

यवतमाळ जिल्ह्यातील पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याचे साखर पुजन व शेतकरी मेळावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास पालकमंत्री संजय राठोड, खा.भावना गवळी, खा.हेमंत पाटील, आ.नामदेव ससाने, आ.तान्हाजी मुरकुटे, भिमराव केराम, माजी खासदार शिवाजीराव माने, माजी आमदार राजेंद्र नजरधने, विजय खडसे, प्रकाश पाटील देवसरकर आदी उपस्थित होते.

नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी शेतकऱ्यांना चांगली मदत करता यावी यासाठी आपण निकषाच्या बाहेर जावून निर्णय घेतले. दोन हेक्टर मदतीची मर्यादा तीन हेक्टर केली. सततचा पाऊस नुकसानभरपाईच्या टप्प्यात आणला. केंद्र शासनाच्यावतीने प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून वर्षाला 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. याच धर्तीवर राज्य शासनाने पुन्हा 6 हजार रुपये देण्याचा निर्णय केला. त्यासाठी 5 हजार 700 कोटींची तरतूद आपण केली. त्यातील 1 हजार 800 कोटी रुपयांचे वाटप देखील आपण केले. या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजार रुपये सहाय्य मिळत असल्याचे मुख्यमंत्री श्री.शिंदे पुढे बोलतांना म्हणाले.

वेगवेगळ्या कारणाने शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. अशावेळी त्यांच्या पिकाला हक्काचे संरक्षण असणे गरजेचे आहे. त्यामुळेच यावर्षापासून आपण पिकविमा योजना व्यापक प्रमाणावर राबवतो आहे. शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून या योजनेत सहभागी होता येत आहे. विम्याची रक्कम शासनाच्यावतीने भरली जाते. यावर्षी पहिल्यांदाच 1 कोटी 70 लाख शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम देण्याचा आपण निर्णय घेतला. त्याचे वाटप देखील सुरु आहे.

पोफाळी येथील आठ वर्षांपासून बंद साखर कारखाना सुरू झाल्याने 26 हजार सभासद शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. बंद कारखाना सुरु करण्याचे पुण्याचे काम खा.हेमंत पाटील यांनी केले आहे. शेतकऱ्यांसह परिसरातील तालुक्यांना निश्चितच त्याचा चांगला फायदा होणार आहे. राज्यातील आत्महत्या कमी करण्यासाठी आपण टास्क फोर्स स्थापन केला. शेतकऱ्यांनी देखील खचून न जाता आधुनिक, सेंद्रीय, प्रयोगशिल शेती केली पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

बांबू अतिशय चांगले पिक आहे. मनरेगात आपण बांबूचा समावेश केला. यासाठी हेक्टरी 7 लाख रुपये दिले जाते. बांबू चांगला जोडधंदा असल्याने परिसरात त्याचे क्लस्टर करता येईल का? यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. पैनगंगा नदीवर मंजूर 6 बंधाऱ्यांचे काम तातडीने पुर्ण होण्यासाठी त्याची निविदा प्रक्रिया जलदगतीने करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.

प्रास्ताविक भाषणात खा.हेमंत पाटील म्हणाले, 50 वर्षांपूर्वी वसंतराव नाईक यांनी परिसरातील शेतकऱ्यांसाठी साखर कारखाना सुरु केला. आज हा कारखाना सुरु होतांना अतिशय आनंद होत आहे. पैनगंगा नदीवर मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी 6 बंधारे मंजूर केले. या बंधाऱ्यांचे काम लवकर होण्यासाठी निविदा प्रक्रिया गतीने होणे आवश्यक आहे. बंधाऱ्यामुळे परिसरात 75 हजार हेक्टर क्षेत्राला लाभ होणार असल्याचे खा.पाटील म्हणाले.

आ.नामदेव ससाने यांनी देखील मनोगत व्यक्त केले. यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्याहस्ते कृत्रिम अंग वाटपाचे उद्घाटन तसेच मुख्यमंत्री आपल्या दारी अंतर्गत मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या सौजन्याने तयार करण्यात आलेल्या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमास ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading