Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

पुस्तक महोत्सवातील युवकांचा सहभाग आशादायी – डॉ. राजा दीक्षित

पुणे : पुण्यात झालेल्या विश्वविक्रमी पुस्तक महोत्सवातील युवकांचा उत्साही आणि उल्लेखनीय सहभाग सर्वांत आशादायी होता. त्यामुळे सर्वांच्याच मनातील आशावाद बळकट झाला, असे गौरवोदगार अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. राजा दीक्षित यांनी काढले.
अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि संवाद पुणे यांच्या वतीने आयोजित कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते. पुण्यात गाजलेल्या आणि विश्वविक्रमी ठरलेल्या पुस्तक महोत्सवाचे आयोजक राजेश पांडे आणि आनंद काटीकर यांचा यावेळी जाहीर सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. भारत सासणे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. राजा दीक्षित होते. व्यासपीठावर साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघांचे अध्यक्ष राजीव बर्वे, प्रमुख कार्यवाह पराग लोणकर, संवाद पुणेचे सुनील महाजन उपस्थित होते.
डॉ. दीक्षित म्हणाले, पुस्तक महोत्सवाची चळवळ फोफावत जावी. पुस्तक ही जीवनावश्यक वस्तु ठरावी यासाठी शासन स्तरावर पुढाकार घेतला जावा.
डॉ. भारत सासणे म्हणाले, इंग्रजी भाषेच्या आक्रमणाची चिंता असताना भव्य पुस्तक महोत्सव आनंद देणारी बाब होती. अशा महोत्सवांना अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्रा बाहेरील लोकांनाही मराठी पुस्तक महोत्सवाशी जोडणे गरजेचे आहे. पुस्तक महोत्सवाच्या रूपाने समाजाला मोठे योगदान दिले आहे.
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, पुस्तक महोत्सव म्हणजे पुणे पॅटर्न अशी पुण्याची नवी ओळख आता निर्माण होईल इतके प्रेरक वातावरण पुस्तक महोत्सवाने निर्माण केले. पुस्तक महोत्सवातील विक्रमी उलाढाल लक्षात घेता कोण नेमकं काय वाचतं हे जाणून घेण्यासाठी वाचन संस्कृतीचे सर्वेक्षण होणे गरजेचे आहे.
प्रा. आनंद काटीकर म्हणाले, तरुण मुलं पुस्तक महोत्सवाकडे वळली याचा अधिक आनंद आहे. पुढील वर्षी अधिक चांगला महोत्सव करण्याचा आमचा प्रयत्न राहिल.
राजीव बर्वे यांनी स्वागत केले. पराग लोणकर यांनी प्रास्ताविक केले. सुनील महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. येत्या मे महिन्यात मुलांसाठी असाच काही वाचनकेंद्रित उपक्रम घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. सुनिताराजे पवार यांनी मानपत्राचे वाचन केले. अमृता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.

पुण्याला बनवणार वर्ल्ड बुक कॅपिटल!
सत्काराला उत्तर देताना पुस्तक महोत्सवाचे आयोजक राजेश पांडे म्हणाले, पुस्तक महोत्सवाला मिळालेले यश हे उत्कृष्ट लोकसहभागाचे आहे. 11 कोटींपेक्षा अधिक उलाढाल ही मोठी बाब आहे. पुस्तक महोत्सव हा इव्हेन्ट न राहता ती मूव्हमेंट व्हावी असा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे पुस्तक महोत्सवाला चळवळीचे स्वरूप यावे म्हणून पुणे हे वर्ल्ड बुक कॅपिटल व्हावे असा आपला प्रयत्न आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading