Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

अयोध्या ही सर्वांची पुण्यभूमी आणि मातृभूमी – डॉ. कुमार विश्वास

पुणे : आपण मूळ अमूक गावातील आहोत, असे प्रत्येकजण सांगतो. मात्र, आपली उत्पत्ती ही मनू राजा च्या कुळातून झाली आहे. मनू हे अयोध्येचे प्रथम सूर्यवंशी राजे होते. त्यामुळे अयोध्या ही आपल्या सर्वांची पुण्यभूमी आणि मातृभूमी आहे. तपस्वी, त्यागी, वैरागी असे प्रभू श्रीरामांचे अयोध्येतील कुटुंब होते. त्यामुळे या परिवारातील प्रत्येकाच्या कार्याचा उद्देश समजून घेत त्यांचा आदर्श आपण घ्यायला हवा, असे सांगत कवी प्रख्यात कवी डॉ. कुमार विश्वास यांनी प्रभू श्रीराम, अयोध्या आणि संपूर्ण कुटुंबाच्या कार्याचे वर्णन आपल्या अमोघ वाणीतून केले.

पुणे जिल्हा अग्रवाल समाजातर्फे ‘अपने अपने राम’ या कार्यक्रमाचे आयोजन आरटीओ जवळील एसएसपीएमएस च्या मैदानात करण्यात आले होते. त्याच्या समारोपाच्या तिस-या दिवशी डॉ. कुमार विश्वास यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या संगीतमय राम ऊर्जा सत्राकरिता पुणे, पिंपरी-चिंचवड सह जिल्ह्यातून ५ हजार हून अधिक समाज बांधव उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सिया वर रामचंद्र की जय च्या जयघोषात भगवे ध्वज आसमंतात फडकत होते. तर, रामजी की निकली सवारी… सालासर हनुमान…सिया जी बहिनिया हमार हो, राम लगी हे पहुनवा…यांसह विविध गीतांच्या सादरीकरणाने उपस्थितांच्या मनावर अधिराज्य गाजविले. तीन दिवसीय कार्यक्रमातून श्रीराम कथा आणि वर्तमानात प्रभू श्रीरामांच्या जीवनातील मूल्यांचे महत्व अत्यंत सोप्या शब्दात मांडत तरुणाईला धर्माशी जोडण्याचा प्रयत्न अग्रवाल समाजातर्फे करण्यात आला आहे. कविता तिवारी यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.

डॉ. कुमार विश्वास म्हणाले, श्रीराम, लक्ष्मण, भरत, शत्रुघन यांसह त्यांच्या माता कौसल्या, सुमित्रा, कैकयी आणि सूना यांचे कार्य आदर्शवत होते. आज आपल्यासमोर परिवाराची चुकीची व्याख्या ठेवून आक्रमण होत आहे. राम जिथे राहतील तिथे अयोध्या असेल, असा विचार या परिवाराचा होता. रामरुपी आदर्शाच्या अमृताचा प्रसाद पृथ्वीवर सर्वत्र वाटला जावा, याकरिता माता कैकयी ने अनेक अटी शर्ती ठेवल्या. त्याबद्दल, सर्वांनी उलटसुलट बोललेले ऐकून घेत आपल्या कार्यातून जणू हे वेगळे विषच प्यायले होते. मात्र, हे पृथ्वीच्या कल्याणासाठी प्यायलेले हे विष म्हणजे कैकयी मध्ये शिवतत्व निर्माण झाले, असेच म्हणावे लागेल.

ते पुढे म्हणाले, आठ चक्र आणि नऊ दरवाजांची ईश्वरापुरी म्हणजे अयोध्या असे अयोध्येचे वेदांमध्ये वर्णन आहे. वाल्मिकी रामायणात प्रत्यक्ष इतिहास मांडला असून इतर कथांमध्ये भक्ती, रस यांचा उल्लेख आढळतो. प्रत्यक्षात आपला देश हा दोन संस्कृतींवर आधारलेला आहे. ती म्हणजे ऋषी आणि कृषी संस्कृती.

प्रभू श्रीरामांचा जन्म हा ऋषींनी दिलेल्या फळाच्या प्रसादाद्वारे तर, माता सीतेचा जन्म हा राजा जनक शेतात नांगर चालविताना सापडलेल्या कुंभातून झाला आहे. त्यामुळे आपला देश प्रभू राम आणि माता सीता यांच्याशी निगडीत असलेल्या ऋषी आणि कृषी संस्कृतीवर आधारलेला दिसतो. सूर्य, पृथ्वी आणि वायू म्हणजेच प्रभू श्रीराम, माता सीता व हनुमान अशांच्या गुणांशी संबंधित आहे. त्यामुळे आपण सर्व भारतीय मूळ अयोध्यावासी आहोत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading