Wednesday, September 2, 2026
Latest NewsPUNE

ऑटोमायजेशनमुळे भाषेचे सौंदर्य आटले; डॉ. सच्चिदानंद जोशी यांचे प्रतिपादन

पुणे  : नव्या पिढीमध्ये भाषेची गोडी निर्माण करण्याचे दायित्व हे आपल्या पिढी हे आहे. आज मोबाईल व इतर उपकरणे यांमुळे शुद्ध भाषा लिहिणे ही समस्या बनली आहे. या ऑटोमायजेशनमुळे भाषेचे सौंदर्य आटले आहे, असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट्सचे प्रमुख डॉ. सच्चिदानंद जोशी यांनी केले.

डॉ जोशी यांच्या उपस्थितीत आज पुण्यातील भाषा फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने आणि भांडारकर प्राच्यविद्या संस्था व गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था यांच्या सहकार्याने आयोजित कथायात्रेला सुरुवात झाली. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ अभय फिरोदिया, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन, भाषा फाउंडेशनच्या अध्यक्षा व कथायात्रेच्या रचनाकार स्वाती राजे, जयदीप राजे आदी मान्यवर उपस्थित होते.

‘नवोन्मेष : सेलिब्रेटिंग स्टोरी ऑफ रिज्युव्हिनेशन’ ही यावर्षीच्या कथायात्रा २०२३ ची मध्यवर्ती संकल्पना असून आजच्या धकाधकीच्या जीवनातून हरवत चाललेल्या ‘गोष्टी’ला पुन्हा नव्याने झळाळी मिळावी, तिचं महत्व पुन्हा आपल्या आयुष्यात रुजावं या उद्देशाने कथायात्रेचे आयोजन भाषा फाऊंडेशनच्या वतीने करण्यात येते.

उद्घाटनावेळी बोलताना डॉ जोशी म्हणाले, ” केवळ भाषा बोलण्याचा आग्रह करणे पुरेसे नाही. भाषा शुद्धतेचा आग्रह करणे हे आपले कर्तव्य आहे. आपल्या देशात आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान नसतो म्हणून आज भाषेवर संकटे येत आहेत. हे असे का झाले याचा विचार करायला हवा. आपणच आपल्या मातृभाषेला मागे लोटलं आहे.”

आज भारतात २ कोटींहून जास्त इतका जगातील सर्वांत मोठा हस्तलिखितांचा संग्रह आहे. मात्र ही बाब भारतीयांनी माहिती नाही, याचे अनेकदा वाईट वाटते. याबद्दलची जाणीव व माहिती नागरिकांना व्हायला हवी.”

देशाच्या नव्या संसदेत कलाकृती कोणत्या असाव्यात या संदर्भात सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत येणारे काम मी पाहिले. भारताच्या समृद्ध परंपरेचे दर्शन कलाकृतींद्वारे करण्याचा आम्ही प्रयत्न केला असल्याचेही जोशी म्हणाले.

पुण्यातील लोक शुद्ध मराठी बोलतात इथे आल्यावर मला मराठीमध्ये बोलायची धडकी भरते. तुम्ही इतके वाईट मराठी बोलत नाही हो .. ही पुणेकरांची प्रतिक्रिया मला सुखावून जाते असेही डॉ जोशी यांनी सांगितले.

भाषा ही केवळ लिखित किंवा बोललेली भाषा नसते तर नृत्यातील भाव, मुद्रा यातूनही भाषा सुंदरपणे मांडता येते असे सांगत डॉ अभय फिरोदिया म्हणाले, “भाषा ही माणसाला माणूस बनवते. भाषा नसेल तर विचारांची देवाण घेवाण करता येणार नाही. इतर प्राण्यांपेक्षा माणूस भाषेमुळेच वेगळा ठरते. मागील ३०-४० वर्षांत प्रादेशिक भाषा उपेक्षीली गेली आहे. आपली पुढची पिढी मराठी भाषेच्या सौंदर्याला मुकली आहे. त्यांना मराठी भाषेतील भावना, स्फूर्ती यांचा आनंद घेता येणार नाही याचे वाईट वाटते.”

आज भाषा सुधारण्यासाठी नव्या पिढीत लहान मुलांमध्ये भाषेचे प्रेम वाढविण्याचे असे उपक्रम व्हायला हवेत. हे करणे नागरिक म्हणून आपले मूलभूत कार्य आहे. याचे परिणाम लगेच पुढच्या आठवड्यात दिसणार नाही पण भाषेची, देशाची सांस्कृतिक मूमूल्ये यामुळे नजीकच्या भविष्यात टिकतील आणि पुढे जातील, असेही डॉ फिरोदिया यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या उद्घाटना आधी ज्येष्ठ इटालियन नृत्यांगना पद्मश्री डॉ.इलियाना सिटारिस्टी यांच्या ओडिसी नृत्यातून सादर केलेल्या एकलव्याच्या कहाणीने महोत्सवाला सुरुवात झाली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading