Monday, August 31, 2026
Latest NewsPUNE

ओबीसी नेत्यांच्या वक्तव्यांवरून वाद पेटल्यास त्याला ओबीसी नेतेचं जबाबदार असतील

 

छगन भुजबळ व विजय वडेट्टीवार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा

छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांची मागणी

पिंपरी  :  मराठा समाजाने मंत्री छगन भुजबळ व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना आतापर्यंत साथ दिली आहे. उद्या महाराष्ट्रात यांच्या वक्तव्यांवरून वाद पेटल्यास त्याला सर्वस्वी हेच ओबीसी नेते जबाबदार असतील. त्यामुळे छगन भुजबळ व विजय वडेट्टीवार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांनी केली आहे.
             रामभाऊ जाधव यांनी सांगितले, की छगन भुजबळ व विजय वडेट्टीवार यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी मराठा समाज तयार झालेला आहे. हे नेते दोन समाजात वाद निर्माण करून स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ओबीसी नेत्यांना आवाहन आहे की सर्वसामान्य ओबीसी बांधव हे मराठा समाजासोबत आहेत, पहिलेही होते. मात्र, काही मोजकेच नेते मिळून मराठा समाज व ओबीसींमध्ये वाद निर्माण करत आहेत. जालना जिल्ह्यातील अंबड शहरात ओबीसी नेत्यांनी स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी व अस्तित्व आहे हे दाखवण्यासाठी सभा घेतली. या सभेत ओबीसी समाजाला न्याय कसा देता येईल, त्यांची प्रगती कशी करता येईल, हे सोडून मराठा समाजाच्या नेत्यांवर खालच्या पातळीला जाऊन टीका केली. त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो.
             सत्ताधारीच एका समाजाच्या विरोधात एकत्र येत असतील, तर मराठा समाजाला न्याय कसा मिळेल ? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे त्यांच्या बाजूने बोलून मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना, असा सवाल निर्माण होतो. मराठा समाजाला आता 50 टक्क्यांच्या आत त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे, तसेच सरसकट कुणबी दाखले मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार मिळाले पाहिजेत; अन्यथा मराठा समाज आता शांत बसणार नाही. महाराष्ट्राची शांतता अबाधित ठेवायची असेल, तर या नेत्यांना मुख्यमंत्र्यांनी आवर घालावा.
          मराठा समाज कोणाच्याही विरोधात नाही कोणत्याही जातीच्या विरोधात नसताना अशा पद्धतीने मराठा समाजाचा द्वेष करून भुजबळ व वडेट्टीवार हे दोन्ही नेते त्यांच्याकडे असलेल्या संविधानिक पदाचा गैरवापर करत आहेत. त्यामुळे या दोघांचे तात्काळ राजीनामे घ्यावेत, मंत्रिमंडळातून तसेच विरोधी पक्षनेते या पदावरून त्यांची हकालपट्टी करावी. 24 डिसेंबर ही अंतिम तारीख असून, या तारखेपर्यंत मराठा समाज राज्य सरकारवर विश्वास ठेवून आहे. परंतु आमचा विश्वासघात झाला, तर मराठा योद्धा जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे मुंबईत मराठा काय आहे, हे सरकारला बघायला मिळेल. पण त्यावेळी जे परिणाम होतील, त्याला सर्वस्वी राज्य शासन, प्रशासन असेल, असा इशाराही रामभाऊ जाधव यांनी दिला आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading