सक्षम हिंदू समाज निर्माण करण्याची गरज – प.पू. गोविंददेव गिरी महाराज
पुणे : श्री राम जन्मभूमीचा ताबा परत मिळविण्यसाठी हिंदूंनी ५०० वर्षे संघर्ष केला आहे. आता श्री रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापना करण्याची वेळ जवळ आली आहे. मंदिराच्या उभारणी बरोबरच आता मंदिराच्या संरक्षणाची जबाबदारी पुढच्या पिढीवर आलेली आहे, यामुळे सक्षम हिंदू समाज निर्माण करण्याची गरज आहे, असे मत श्रीराम मंदिर निर्माण समितीचे कोषाध्यक्ष प.पू. गोविंददेव गिरी महाराज यांनी व्यक्त केले.
विश्व हिंदू परिषद मंदिर आणि अर्चक पुरोहित संपर्क विभाग यांच्या वतीने अयोध्येतील रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त महाराष्ट्रात ‘हर घर भगवा ध्वज’ अभियान १ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधी राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात आज शनिवार पेठेतील रमणबाग प्रशाला येथे प.पू. गोविंददेव गिरी महाराज यांच्या हस्ते ध्वज पूजन करून करण्यात आली, या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पांडुरंग राऊत होते. मनोहर ओक, संजय मुरदाळे, बाबूजी नाटेकर, पं. वसंतराव गाडगीळ, संजय देखणे, बापूसाहेब पोकळे, बाळासाहेब नवले, गणेश वनारसे, मिलिंद ओतारी, सुधीर पाचपोर यावेळी उपस्थित होते.
प.पू. गोविंददेव गिरी म्हणाले, आपली पिढी भाग्यवान आहे, राम मंदिराच्या उभारणीचे आपण साक्षीदार आहोत. मंदिराच्या उभारणी साठी ७८ युद्धा मध्ये ३ लाख हिंदूंनी बलिदान दिले आहे. आता भारताच्या पुनर्निर्मितीचा काळ सुरू आहे.
दसरा आणि दिवाळीच्या मध्यावर आपण ‘हर घर भगवा ध्वज’ या नव्या उपक्रमाचा शुभारंभ केला आहे. राम मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा देशात दिवाळीप्रमाणेप्रमाणे साजरा करण्यात यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी पांडुरंग राऊत, पं.वसंतराव गाडगीळ यांनी मनोगत व्यक्त केले. संजय देखणे यांनी आभार मानले. प्रमोद मिसाळ यांनी सूत्रसंचालन केले.
