महायुती सरकारने पीएमपी केली दिशाहीन – माजी आमदार मोहन जोशी यांचा आरोप
पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) अध्यक्ष सचिंद्र प्रतापसिंह यांची अवघ्या चार महिन्यांत बदली करून महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस-पवार यांच्या महायुती सरकारने कारभार दिशाहीन केला असून, या बदल्यांमागे भाजपचे हितसंबंध राखण्याचा हेतू आहे, असा आरोप माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे केला आहे.
सर्वसामान्य प्रवाशांच्या दृष्टीने पीएमपीएमएल ची सेवा हा एकमेव पर्याय आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर तसेच जिल्ह्यातील सुमारे १२लाख प्रवासी पीएमपीतून दररोज प्रवास करतात. पीएमपीएमएल कडे सोळाशे बसगाड्या असून १०हजार कर्मचारी सेवेत कार्यरत आहेत. पीएमपीएमएल च्या कारभाराचा एवढा मोठा पसारा आहे. परंतु भाजपच्या नेत्यांचे हितसंबंध यातील खरेदी-विक्रीमध्ये दडलेले असल्याने शिस्तप्रिय अधिकाऱ्यांना बदलले जात आहे. भाजपने पुण्याला नेहमीच दुय्यम वागणूक दिली असून, पीएमपीएमएल कडे जाणुनबुजून दुर्लक्ष करण्यामागे हेच कारण असल्याचा आरोप मोहन जोशी यांनी केला आहे.
सचिंद्र प्रतापसिंह चांगला कारभार करत होते. कारभाराला शिस्त लावण्याचा त्यांचा प्रयत्न होता,उत्पन्न वाढू लागले होते,प्रवासी वाढावेत अशा दिशेने ते काम करत होते. अवघ्या चार महिन्यांत त्यांची बदली करण्यात आली. यापूर्वी ओमप्रकाश बोकाडिया या प्रामाणिक अधिकाऱ्याची मुदतीपूर्वीच बदली करण्यात आली. असे मोहन जोशी यांनी निदर्शनास आणून दिले.
सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम व्हायला हवी, असे भाजप नेते भाषणांमधून सांगत असतात, प्रत्यक्षात कृती मात्र पीएमपीएमएल या सार्वजनिक सेवेला दिशाहीन करणारी आहे. भाजपच्या हितसंबंधांचा डाव पुणेकरांनी ओळखावा आणि पीएमपीएमएल ला पूर्ण वेळ अध्यक्ष मिळावा, यासाठी पुणेकरांनी दबाव आणावा, असे आवाहन मोहन जोशी यांनी केले आहे. सचिंद्र प्रतापसिंह यांची बदली अवघ्या चार महिन्यांत केली, त्या बद्दल काँग्रेस पक्षातर्फे, महायुती सरकारचा निषेध मोहन जोशी यांनी केला आहे.
