खासदार मिसिंग आहेत, पोलिसात तक्रार करा – खासदार सुप्रिया सुळे
सोलापूर : सोलापूरचे खासदार कोण आहेत? मला माहिती नाही. मात्र, तुम्हाला तरी माहिती आहे का? मैंने उनको ना देखा है… ना सूना है…., कौन है भैयाङ्घ? अगर बेपत्ता है, तो पुलिस ठाणें मे जाके कंप्लेंट करो. माझी सगळ्यांना विनंती आहे. खासदार मिसिंग आहे, बॉस…. अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी भारतीय जनता पक्षाचे सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्यावर हल्लाबोल केला.
सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अल्पसंख्याक समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात खासदार सुळे यांनी जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्यावर पुन्हा निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या विरोधात अदृश्य शक्ती ही दिल्लीवरून काम करत आहे. अदृश्य शक्तीचा अर असा कोडवर्ड आहे.
सोलापूर हे महाराष्ट्रातलं महत्त्वाचं शहर आहे, पण या शहराचा खासदार मिसिंग असेल, तर मीटिंग कॅन्सल. आता आपण सगळे जाऊ चला पोलिस स्टेशनला. मला असं वाटतंय की, परत त्या अदृश्य शक्तीचा काय तरी प्रॉब्लेम आहे. अदृश्य शक्तीमुळं सोलापूरचं पाणीही गायब आणि एमपी पण गायब आणि विकास ही गायब अन् आमदारही गायब असा टोला त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना लगावला.
त्या म्हणाल्या की, मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत पार्लमेंटमध्ये असते, पण मला तर ते कधी दिसले नाहीत. जसं रेल्वेत वडापाव वडापाव म्हणून ओरडतात तसं मी पार्लमेंटमध्ये सोलापूर, सोलापूर असं म्हणणार आहे. आपल्याला काय काय जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत, ते ठरवून घ्या. खासदार शोधणे, पाणीपट्टी न भरणे, घागर मोर्चा काढणे, स्मार्ट सिटीचं बक्षीस नेमकं आहे कुठे?
काय चाललंय सोलापूरमध्ये. हे आता मला शरद पवार यांना सांगावं लागेल. त्यांचा तुमच्यावर आणि तुमचा त्यांच्यावरच जीव आहे. आता पवारसाहेबांना इथे येऊन दोन-चार दिवस राहावं लागेल. आणि त्या आपल्या चिमणीचं काय झालं…? विमान येतं ना? असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी चिमटा काढला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पार्लमेंट उघडेल ना तेव्हा मी सर्वांना सांगेन. आम्हाला सोलापूरहून थेट श्रीनगर, काश्मीरला विमान पाहिजे. चिमणी बांधायला नवीन परवानगी देणार का? मी २०२४ शिवाय चिमणीसाठी परवानगी कशी देणार? त्यासाठी तुम्हाला २०२४ पर्यंत थांबावं लागेल. या २०२४ मध्ये दोन निवडणुका आहेत. एक इंडिया आणि दुसरं महाविकास आघाडीचं. सोलापूरमध्ये आपल्याला या वेळी बदल घडवायचा आहे. इंडियाचाच खासदार निवडून आणायचा आहे आणि तो तुमच्या आयुष्यात बदल घडवेल.
