बाल वारक-यांचा पर्यावरण दिंडीतून निसर्ग संवर्धनाचा संदेश
पुणे : ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम चा गजर आणि पाणी अडवा, पाणी जिरवा…बेटी बचाव, बेटी पढाव… असा संदेश देत विठ्ठल रखुमाईसह वारक-यांच्या वेशात सहभागी झालेल्या चिमुकल्या वारक-यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. बालवाडीपासून ते कनिष्ठ महाविद्यालयापर्यंत विविध वयोगटातील विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे पालखी सोहळ्यात सहभाग घेत जनजागृती केली.
न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटमधील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीनिमित्त पर्यावरण दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जाधवर ग्रुपचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर यांसह शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक उपक्रमात सहभागी झाले.
प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर म्हणाले, शेतक-यांसह संपूर्ण समाजातील विविध घटकांचे कल्याण होवो, अशी प्रार्थना सर्व वारकरी विठ्ठलचरणी आषाढीच्या दिवशी करतात. परंतु यासोबत पर्यावरण रक्षणाचा संदेश देत नव्या पिढीमध्ये जनजागृतीचा प्रयत्न यानिमित्ताने करण्यात आला.
अॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, वाढते प्रदूषण आणि अस्वच्छता यामुळे पर्यावरणाचा -हास होत आहे. केवळ वृक्षारोपण हा पर्याय नसून आपल्या आजूबाजूला असलेल्या झाडांचे संगोपन करणे, हे महत्त्वाचे आहे. लहान वयात विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व कळायला हवे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाचे काम ते भविष्यात चांगल्या पद्धतीने करू शकतील, असेही त्यांनी सांगितले.
