Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

योग्य विद्यार्थी नसल्यामुळे चांगल्या मल्लविद्या लुप्त – मंदार लवाटे

पुणे : जांबुवंत, जरासंध,हनुमंत, भीम,रावण, कृष्ण हे सगळे मल्ल होते. सगळ्यांच्या विद्येमध्ये प्रचंड ताकद होती. त्यांच्याकडे कुस्ती किंवा संरक्षणाची विद्या होती. या विद्येतील किरकोळ विद्या पुर्वेकडे गेली आणि त्याचे कराटे आणि कुंफूमध्ये रुपांतर झाले. अशा अनेक मल्लविद्या आपल्याकडे आहेत. योग्य विद्यार्थी नसल्याने कालांतराने मर्मसूत्र, कृष्णी सारख्या काही विद्या लुप्त झाल्या, असे मत इतिहास अभ्यासक मंदार लवाटे यांनी व्यक्त केले.

अखिल मंडई मंडळाच्या वतीने मर्दानी खेळांच्या प्रशिक्षण शिबिराचा समारोप शारदा गजानन मंदिरा शेजारील प्रांगणात करण्यात आला होता. यावेळी सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, विश्वस्त विश्वास भोर, आनंद सराफ, प्रशिक्षक कुंडलिक कचाले आदी यावेळी उपस्थित होते.

मंदार लवाटे म्हणाले, आपली प्राचीन शस्त्रे वापरली पाहिजेत. शस्त्रे वापरली नाहीत तर त्याची धार बोथट होते. लाठी हे खूप जुने हत्यार आहे. माणसाचे संरक्षणासाठीचे पहिले हत्यार लाठी हेच होते. विशेषतः मुलींनी लाठी-काठीचा सराव करायला पाहिजे. भाईगिरी करण्यासाठी नाही तर रक्षणासाठी शस्त्रे हातात घ्या. देवानेही रक्षणासाठीच शस्त्रे हातात घेतली, असेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, दररोज व्यायाम करायला हवा आणि त्या सोबत उपासना करायला हवी. देवाची उपासना केल्यास विद्या मिळतील कोणतीही विद्या मिळविण्यासाठी आयुष्य घालवावे लागते, असेही त्यांनी सांगितले.
अण्णा थोरात म्हणाले, सध्याच्या काळात मर्दानी खेळांचे प्रशिक्षण मुलांनी घेण्याची गरज आहे. केवळ प्रशिक्षण न घेता त्याचा रोज सराव करायला हवा.  व्हिडिओ गेमपेक्षा ही मर्दानी खेळांची गेम चांगली आहे. जे पालक आपल्या पाल्यांना आवर्जून या खेळांच्या प्रशिक्षणाला पाठवतात त्यांचे विशेष कौतुक आहे, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading