युनेस्कोच्या परवानगीशिवाय बारसू रिफायनरी कशी ? राज ठाकरे यांचा सवाल
रत्नागिरी : इथल्या लोकप्रतिनधींना तुमच्याबद्दल काहीही वाटत नाही, हे विसरू नका. कोकणवासियांनो आता तरी जागे व्हा. बारसूमध्ये युनेस्कोला कातळशिल्प सापडली आहेत. युनेस्को जगभरातील अनेक हेरिटेज वास्तूंच जतन करते. आता आपल्याकडे कातळशिल्प सापडली आहेत, त्यामुळे अशा हेरिटेज वास्तूच्या आसपास कोणताही मोठा प्रकल्प किंवा युनेस्कोच्या परवानगीशिवाय मोठं बांधकाम करता येत नाही, असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बारसू रिफायनरी च्या निर्मितीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच रत्नागिरीमध्ये सभा घेतली. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या बारसू प्रकल्पाला राज ठाकरे यांनी देखील विरोधाचा सुर दिला आहे. त्यावर राज ठाकरे भाष्य करताना राज ठाकरे यांनी कोकणवासियांना जमिनी न विकण्याचा सल्ला दिलाय. त्यावेळी त्यांनी स्थानिकांना भावनिक आवाहन देखील केलं. तसेच सत्ताधाऱ्यांवर आणि उद्धव ठाकरे यांच्यावर राज यांनी टीका केली.
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले होते की आपले शत्रू समुद्रमार्गाने येतील. त्यामुळे समुद्रावर डोळ्यात तेल घालून नजर ठेवा. पण आपण दुर्लक्ष केलं. 26/11 चा अतिरेकी हल्ला करणारे अतिरेकी समुद्र मार्गाने आले. 1992 च्या बॉम्बस्फोटात वापरलेलं आरडीएक्स पण समुद्र मार्गाने आलं होतं. पण आपण महाराजांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केलंय, असेही राज ठाकरे यांनी नमूद केले.
