आपल्याला आगामी काळात सिक्सर मारायचा आहे – अशोक चव्हाण
मुंबई : “आजचा दिवस ऐतिहासिक दिवस आहे. मविआच्या सभांना जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. बाजार समितीची निवडणूक नुकतीच पार पडली. तीन पक्ष एकत्र आल्यानंतर महाराष्ट्राचं भविष्य आपण घडवू शकतो, असा मत शेतकऱ्यांनी दिलं आहे. शेतकऱ्यांनी अडचणींच्या काळात मविआच्या बाजूने कौल दिला. आपण हॅट्र्रीक साधली. विधान परिषदेचे निकाल, अंधेरी पोटनिवडणूक आणि बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल हॅट्र्रीक आहे. आपल्याला आगामी काळात सिक्सर मारायचा आहे. ही मुंबई महापालिका आपणच आणणार आहोत हा निर्धार करण्यासाठी आपल्याला एकत्र यायचं आहे. आपल्यावर मविआ म्हणून जबाबदारी पार पाडायची आहे. आयाराम गयाराम लोकांना जवळ करयचं कारण नाही”, असे माजी मुख्यमंत्री, कॉँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले.
महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेत चव्हाण बोलत होते. पुढे बोलताना चव्हाण म्हणाले, “राजकारणात जे चाललं आहे त्याबद्दल लोकांच्या मनात नाराजी हे सगळं पाहिल्यानंतर दिवार चित्रपटाचा डायलॉग आठवतो. हमारे पास गाडी, बंगला, पैसा है, तुम्हारे पास क्या है? हमारे पास उद्धव ठाकरे, नाना पटोले, अजित दादा है. आपलं इंजिन ताकदवान आहे, आपण तिघं एकत्र येऊन स्वबळावर चांगलं सरकार स्थापन करु शकतो हे येत्या महापालिका निवडणुकीत दाखवून देऊ. यांना मुंबई महापालिका कशाला हवीय? तर 92 हजार कोटींची फिक्स डिपोझिट तोडायची आहे”
“यांचं इंजिन चीनची घुसखोरी, महागाईवर बोलत नाही. मग यांच्या डबल इंजिन सरकारचा उपयोग काय? यांच्या ट्रिपल इंजिनला लाल सिग्नल दिलं पाहिजे आणि मविआला ताकद दिली पाहिजे. कर्नाटकात आज चांगल्या पद्धतीने काँग्रेसला प्रतिसाद मिळतोय. कर्नाटकाचा निकाल हा देशाचं भविष्य बदलणारं असणार आहे. सत्तेत येणं किंवा बाहेर जाणं हे लोकांच्या हातात आहे. लोकांनी सत्तेच्या बाहेर बसवलं तर आम्ही लोकांचा कल मान्य केलं. विद्यमान सरकार सत्तेवर आला तेव्हा त्यांना हार घालण्यासाठी जी लोकं मंत्र्यांच्या गाठीभेट घेतल्या त्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला तेव्हा हजारो लोकं त्यांच्या भेटीसाठी आले होते ते महाराष्ट्राने पाहिलं. राजकारणात एकमेकांना संपवण्याचं काम सुरु आहे. राजकारणात दिवस सारखे राहत नाहीत”, असेही अशोक चव्हाण म्हणाले.
