संजय राऊत यांच्यामुळे आदित्य आणि तेजस ठाकरे यांच्यात भांडणे – आमदार नितेश राणे
मुंबई : आदित्य ठाकरे यांचे वाढते प्रस्थ कमी करण्यासाठी संजय राऊत आणि त्यांच्या सहका-यांकडून आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्यात भांडणे लावण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांनी केला आहे. त्यामुळे दोन्ही भावांमध्ये वाद झाल्याचा दावा देखील राणे यांनी केला आहे.
नितेश राणे म्हणाले की, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्यात वाद लावण्याचे काम संजय राऊत यांच्या माध्यमातून सुरू होते. शिवसेनेत आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांचा प्रभाव वाढतोय म्हणून संजय राऊत आणि त्यांच्या टोळीने षडयंत्र रचण्याचा प्रयत्न केला, असा घणाघाती आरोप त्यांनी संजय राऊतांवर केला आहे.
युवासेना प्रमुख म्हणून वरुण सरदेसाईंचेनाव पुढे येत होते, ते अचानक गायब झाले. यामागचे कारण म्हणजे, युवासेना प्रमुख वरुण सरदेसाई झाल्यास आदित्य ठाकरेंची ताकद वाढणार मग आमचे काय होणार म्हणून लगेच तेजस ठाकरेंच्या नावाने ‘सामना’मध्ये जाहिरात छापून आणली जायची. तेजस ठाकरेंचे बॅनर लावायला महाराष्ट्रभरातील शिवसैनिकांना सांगितलं जायचं असा दावा राणेंनी केला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, त्या काळात या दोन्ही भावांत ‘मातोश्री’मध्ये भांडणं सुरू झाली. काही वेळासाठी तेजस ठाकरे कर्जतच्या फार्महाऊसवर राहायला गेले होते, असा दावा देखील नितेश राणे यांनी यावेळी केला आहे. संजय राऊतांनी ज्या घरात मीठ खाल्लं तेथेही भांडणं लावण्याचे काम केलं, असा आरोपही राणेंनी यावेळी संजय राऊत यांच्यावर केला
