नॅशनल कौन्सिल ऑफ वुमन इन इंडियातर्फे महिला सक्षमीकरण – शांतता आणि शाश्वत विकास’ विषयावर चर्चासत्र
पुणे : नॅशनल कौन्सिल ऑफ वुमन इन इंडिया (एनसीडब्ल्यूआय) या संघटनेच्या शताब्दी वर्षानिमित्त एका विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम शनिवार, २९ एप्रिल रोजी सकाळी १०:३० वाजता गणेशनगर, एरंडवणे येथील डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलच्या शकुंतला जगन्नाथ शेट्टी सभागृह येथे होणार आहे, अशी माहिती इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ वुमन या जागतिक संघटनेच्या पहिल्या उपाध्यक्षा आणि पुणे कौन्सिल ऑफ वुमन संघटनेच्या माजी अध्यक्षा पुष्पा हेगडे यांनी दिली.
या चर्चासत्रात प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी, सामाजिक कार्यकर्त्या आणि तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी कार्य करणाऱ्या श्रीगौरी सावंत, सामाजिक कार्यकर्त्या व शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मंजुश्री पाटील हे तज्ज्ञ सहभागी होणार असून, ‘महिला सक्षमीकरण – शांतता आणि शाश्वत विकास’ या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत.
तसेच याप्रसंगी ज्येष्ठ लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या रेणू यांना स्वयंसिद्धा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.
मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या महिला व बालक यांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने १९२३ साली एनसीडब्ल्यूआय या संस्थेची स्थापना झाली होती. राज्य स्तरावरील महिला परिषदांची शिखर संस्था म्हणून ही संस्था कार्यरत असून, देशभरातील २० राज्यस्तरीय महिला परिषद हे या संघटनेशी संलग्न आहेत. पुण्यातील राखी शेट्टी या सध्या संघटनेच्या अध्यक्ष असून, त्यानिमित्ताने पुणे हे संघटनेचे मुख्यालय आहे. गेल्या १०० शंभर वर्षांत संघटनेने महिला सक्षमीकरण आणि बालविकास या अनुषंगाने अनेक यशस्वी प्रकल्प राबविले आहेत. यामध्ये प्रामुख्याने कौशल्य विकास, वंचित आणि विशेष मुलांसाठी शालेय शिक्षण यांचा समावेश होतो. यंदा संघटना आपले शताब्दी वर्ष साजरे करत असून, त्यानिमित्ताने आम्ही गेले वर्षभर देशभरात अनेक कार्यक्रम आयोजित केले होते. या शताब्दी वर्ष कार्यक्रम शृंखलेतील हा शेवटचा कार्यक्रम पुण्यात होणार आहे, असेही पुष्पा हेगडे यांनी सांगितले.
