दुर्दैवी : महाराष्ट्र भूषण पुरस्काराला गालबोट; 20 जणांचा मृत्यू, 500 हून अधिक रुग्णालयात दाखल
नवी मुंबई : खारघर येथे 306 एकर जागेवर झालेल्या भव्य कार्यक्रमात आज श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या राज्य शासनाच्या या भव्य कार्यक्रमाला गालबोट लागले असून या कार्यक्रमानानंतर 500 हून अधिक श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास झाला आहे. तर 20 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
आज खारघर येथील कार्यक्रमाला धर्माधिकारींचे लाखो अनुयायी उपस्थित होते. त्यापैकी अनेक जण शनिवारीच कार्यक्रमस्थळी आले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार धर्माधिकारी यांना प्रदान केला गेला. हा कार्यक्रम सकाळी 11.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू होता. भर दुपारी झालेल्या या कार्यक्रमामुळे श्री सदस्यांना प्रखर उन्हात बसावे लागले. त्यामुळे अनेकांना उष्माघाताचा त्रास होवू लागला. त्यांना तात्काळ घटनास्थळी उभारलेल्या 30 मेडिकल बूथमध्ये पाठवण्यात आले. मात्र रात्री पर्यंत या रुग्णांचा आकडा वाढत जावून तो जवळपास 500 श्री सदस्यांपर्यंत पोहचला आहे. सर्व गंभीर रुग्णांना एमजीएम रुग्णालय व टाटा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान दिसभरात 20 श्री सदस्यांना मृत्यू झाला असून मृतांचा आकडा देखील वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, श्री सदस्यांचा मृत्यू झाल्याचे कळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनेची दाखल घेत एमजीएम रुग्णालय जावून रुग्णांची विचारपूस केली. यावेळी त्यांच्या सोबत सार्वजनीक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते.
