Wednesday, May 27, 2026
Latest NewsPUNE

शहरी दारिद्र्याचा बीमोड सामूहिक पातळीवरील प्रयत्नातून -प्रा.अमिता भिडे

पुणे- शहरी आणि ग्रामीण दारिद्र्यातील अंतरसंबंध विसरता येणार नाहीत. शहरी दारिद्र्याचा बीमोड सामूहिक पातळीवरील प्रयत्नातून करणे गरजेचे असल्याचे मत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस येथील प्राध्यापिका डॉ.अमिता भिडे यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र विभाग आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण प्रशासन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शहरी सिमांतिकता, सामाजिक धोरण आणि भारतातील शिक्षण या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संत ज्ञानेश्वर सभागृहात दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे उद्घाटन सत्र विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी प्रा भिडे बोलत होत्या. यावेळी अन्नपूर्णा परिवाराच्या संस्थापक संचालक डॉ.मेधा सामंत, राष्ट्रीय शिक्षण धोरण प्रशासन संस्थेतील प्राध्यापिका मनिषा प्रियम आणि समाजशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ.श्रुती तांबे आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. या परिषदेत समाजशास्त्र, स्त्री अभ्यास केंद्र, आयआयटी आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मधील संशोधक शोधनिबंध सादर केले. ह्या परिषदेत त्रिवेंद्रम, हैदराबाद, दिल्ली,मुंबई, नाशिक, अहमदनगर येथील अभ्यासकांसोबतच ओस्लो, नॉर्वे आणि मिनेसोटा विद्यापीठ, अमेरिका येथील अभ्यासकही सहभागी झाले होते.

डॉ.सोनवणे म्हणाले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिसर्च पार्क फाऊंडेशन या सेक्शन आठ कंपनीमार्फत सध्या २२ स्टार्टअप वर काम सुरू असून त्यात जर सामाजिक शास्त्र विषयाशी संबंधित स्टार्ट अप या परिषदेच्या माध्यमातून पुढे आले तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ त्याला नक्कीच पाठबळ देईल. सामाजिक धोरण ठरविण्यात उच्च शिक्षण संस्थांचा मोठा वाटा आहे, याची माहिती विद्यार्थ्यांना करून देत त्यांना त्यासाठी प्रवृत्त करणे हे आपले काम आहे, असे डॉ.सोनवणे म्हणाले.

यावेळी डॉ. प्रियम म्हणाल्या, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे ज्ञानाचे आगार आहे, विविध ठिकाणाहून विद्यार्थी येथे शिकायला येतात म्हणूनच या परिषदेसाठी या विद्यापीठाची निवड केली आहे. महानगरांपलीकडच्या शहरी जीवनावर करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील समाजशास्त्र विभागात महाराष्ट्रातील शहरांवर संशोधन सुरू असते, म्हणूनच आम्ही ही परिषद त्यांच्यासोबत घेत आहोत.

यावेळी मेधा सामंत या त्यांच्या उद्घाटनपर भाषणात म्हणाल्या की, शहरी सिमंतिकता दूर करण्यासाठी समूह आणि समाजाच्या पातळीवरची उत्तरेच शाश्वत ठरतील. अन्नपूर्णा परिवाराच्या उदाहरणावरून त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी स्कूल ऑफ सोशल सायन्सेसच्या संचालक डॉ.राजेश्वरी देशपांडे, रिक्षा पंचायतचे नितीन पवार, परिसर संस्थेचे रणजित गाडगीळ आदी मान्यवरही उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading